आद्यशंकराचार्य कृष्ण तीर्थ महाराज लिखित वैदिक गणिताच्या खंडांचे प्रकाशन

मुंबई – भारतात विकसित झालेल्या विविध शास्त्रांचा पाया गणितावर आधारित आहे. वैदिक गणिताच्या खंडाद्वारे हे ज्ञान नव्याने समाजासमोर येणार आहे. वैदिक गणिताची महती आणि लाभ येणार्या पिढ्यांपर्यंत पोचवणे आवश्यक आहे. त्यासाठी भारती कृष्ण विद्या विहार येथे वैदिक गणिताचे गुणवत्ता केंद्र उभारले जावे, शासनाकडून त्याला संपूर्ण सहकार्य करण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. ‘विश्व पुनर्निर्माण संघ’ संचालित ‘भारती कृष्ण विद्या विहार शाळे’मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प.पू. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आद्यशंकराचार्य कृष्ण तीर्थ महाराज लिखित वैदिक गणिताच्या २ खंडांचे प्रकाशन झाले.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, प्राचीन भारतीय संस्कृतीत अनेक महत्त्वाची शास्त्रे विकसित झाली; मात्र परकीय आक्रमणांमुळे या शास्त्रांतील ज्ञान सर्वांपर्यंत पोचू शकले नाही. आद्य शंकराचार्य कृष्ण तीर्थ महाराज यांनी वेद-ऋचांचा अभ्यास करून सोप्या पद्धतीने संपूर्ण गणिताची मांडणी वैदिक गणित खंडांमध्ये केली आहे. केंद्रीय माध्यमिक मंडळाच्या इयत्ता पाचवी ते सातवीच्या अभ्यासक्रमात या पुस्तकाचा समावेश करण्यात आला आहे. या खंडांच्या माध्यमातून वेदांमधील ज्ञानाचा साठा शंकराचार्यांनी शोधला आहे. वैदिक गणित ही भारताची महत्त्वाची, मोठी ज्ञानसंपदा आहे.
वैदिक गणिताचा विचार विश्वकल्याणासाठी ! – प.पू. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
![]() मानवी जीवनात अनेक प्रसंगांमध्ये गणना, आकडेवारीचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. प्राचीन भारतीय परंपरेतून आलेल्या वैदिक गणिताचा विचार विश्वकल्याणासाठी आहे. जगात अध्यात्मावर आधारित घडत असलेल्या विविध परिवर्तन आणि पुनर्रचना यांमध्ये वैदिक गणित महत्त्वाची भूमिका निभावू शकते आणि जगाला सुखी अन् समृद्ध बनवण्यातही मोलाचे योगदान देऊ शकते. सांख्यदर्शन, वक्ररचना निर्देशांक यांच्यासह नल-दमयंती आख्यान, महाभारत आदींमधील उदाहरणे देऊन त्यांनी गणिताचे महत्त्व विशद केले. |