रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात आल्यावर सौ. स्मिता कानडे यांना जाणवलेली सूत्रे आणि त्यांच्या नामजपात झालेला पालट

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात आल्यावर मिरज येथील ६४ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. स्मिता कानडे यांना जाणवलेली सूत्रे आणि त्यांच्या नामजपात झालेला पालट

१. ‘रामनाथी आश्रमाच्या आगाशीतून चालतांना ‘प्रत्येक पाऊल ईश्‍वराकडे जाण्यासाठी पडू दे’, अशी प्रार्थना झाल्यावर मनातील विचार एकदम न्यून होऊन ‘मी शांत आणि निर्विचार मनाने चालत आहे’, असे अनेक वेळा जाणवले.

२. आश्रमात चालतांना ‘मी सप्तपदीची सात पावले चालत आहे’, असा भाव ठेवल्यावर ‘माझे प्रत्येक पाऊल ईश्‍वराच्या दिशेने पडत आहे’, या विचाराने माझी भावजागृती होत होती.

सौ. स्मिता कानडे

३. जिन्यावरून वर जात असतांना ‘मी वरच्या मजल्यावरील ईश्‍वराकडे जात आहे’, असा भाव ठेवल्याने मला पुष्कळ आनंद मिळत होता.

४. ‘माझा प्रत्येक श्‍वास आणि क्षण तुझ्या अनुसंधानात राहू दे’, अशी प्रार्थना केल्यावर प्रार्थनांचे प्रमाण वाढून सतत कृतज्ञता व्यक्त होत होत्या.

५. रामनाथी आश्रमात आल्यावर अंतर्मुखता वाढून स्वतःतील स्वभावदोष आणि अहं यांचे निरीक्षण करता येऊ लागले.

६. सकाळी आश्रमात आल्यानंतर सूर्यनारायणाला नमस्कार करतांना तो मला ‘पूर्ण दिवस चांगला जाईल’, असा आशीर्वाद देत आहे’, असे जाणवले.

७. आश्रमदेवतेला नमस्कार करतांना पुष्कळच कृतज्ञता वाटते. ‘आश्रम म्हणजे चैतन्याचा महासागर आहे. केवळ आपण ते अनुभवायला पाहिजे’, असे जाणवते.

८. ‘आश्रमाच्या स्वयंपाकघरात ईश्‍वरी राज्य आले आहे’, असे वाटले. तेथे सतत अखंड सेवा करणार्‍या साधकांकडे पाहून परात्पर गुरु डॉक्टरांप्रती मला कृतज्ञता वाटत होती आणि सेवा करतांनाही आनंद मिळत होता.

९. ‘रामनाथी आश्रम हा साक्षात् विष्णूने (परात्पर गुरु डॉक्टरांनी) वसवलेला विष्णुलोकच आहे’, याची अनुभूती येत होती.

१०. नामजपामध्ये झालेला पालट : मी रामनाथी आश्रमामध्ये ५.५.२०१९ या दिवशी आले. त्यानंतर मला असे जाणवू लागले की, माझा वैखरीतून होणारा ‘श्रीराम’ हा नामजप न्यून झाला आहे. आतून होणारा श्रीरामाचा नामजपसुद्धा अल्प प्रमाणात ऐकू येत आहे. मनात कृतज्ञतेचे विचार अधिक प्रमाणात असल्यामुळे बराच वेळ कृतज्ञताभावात रहाता येत आहे. कृतज्ञताभावातही शब्द नसतात; पण ‘सतत परात्पर गुरु डॉक्टरांनी आपल्यासाठी किती केले आहे ?’, हे जाणून तो भाव असतो.’

– सौ. स्मिता कानडे, मिरज (१२.८.२०१९)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक