कोरोनाचे संकट असतांना नवरात्रोत्सवाचे मंडप घालू दिलेच कसे ? – उच्च न्यायालय

नवरात्रोत्सव

मुंबई – कोरोनाचे संकट कायम असतांनाच ऑक्टोबर २०२० मध्ये येथील महापालिकेने नवरात्रोत्सवासाठी मंडप घालण्यास अनुमती दिलीच कशी ? आणि अटींसह अनुमती दिली असेल, तर त्या अटींचे पालन होत आहे कि नाही, हे पडताळण्याची खबरदारी महापालिका प्रशासनाने घेतली का ?, असे प्रश्‍न मुंबई उच्च न्यायालयाने नुकतेच उपस्थित केले. महापालिकेने दिलेल्या अनुमतीविषयी आश्‍चर्य व्यक्त करून मुंबई आणि मुंबई उपनगरांत अशाचप्रकारे खासदार, आमदार, नगरसेवक यांना अशी आयोजने करण्यास दिलेल्या अनुमतीला स्वतंत्र जनहित याचिकेद्वारे कायदेशीर आव्हान देण्याची मुभाही न्यायालयाने याचिकादाराला दिली.

 

गिरीश मित्तल यांनी रिट याचिकेद्वारे दहिसरमधील नवरात्रोत्सवाच्या आयोजनाला आव्हान दिले होते. नगरसेवक प्रकाश दरेकर यांनी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली १७ ते २५ ऑक्टोबर या कालावधीत या नवरात्रोत्सवाचे आयोजन केले होते; मात्र कोरोनाच्या संकटकाळात भव्य मंडप उभारून उत्सवाचे आयोजन करण्यास महापालिकेने दिलेल्या अनुमतीवर मित्तल यांनी आक्षेप घेतला, तसेच आयोजनाच्या संदर्भातील छायाचित्रेही न्यायालयात सादर केले होती.

‘मंडप आणि आयोजनाच्या छायाचित्रावरून नक्षीकाम असलेले भव्य खांब, मूर्ती, मंडपाला पायर्‍या, तसबिरी, फुलदाण्या असे बरेच काही पदपथावरच दिसत आहे. यासह बसण्यासाठी आसनव्यवस्था मंडपाबाहेरच केल्याचे दिसत आहे. मंडपात लोकांची गर्दी दिसत आहे. त्यातील अनेकांनी ‘मास्क’ही नीट घातलेले नाहीत. यावरून कोरोनाविषयी सरकारने घालून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन झाल्याचे दिसत आहे. मुळातच महापालिकेने कोरोनाच्या काळात अशा आयोजनाची अनुमती कशी दिली ?, असे न्यायमूर्ती शाहरूख काथावाला आणि रियाझ छागला यांच्या खंडपिठाने म्हटले.