मोशी (पिंपरी-चिंचवड) येथे ‘अक्सा बेकरी’त धर्मांधांचा हिंदूंच्या आरोग्याशी खेळ !

  • एकाच छताखाली बेकरी उत्पादनांचे उत्पादन आणि बाजूलाच गोवंशियांची अवैध हत्या अन् विक्री !

  • ‘सकल हिंदु समाज’ आणि हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ते यांच्या सतर्कतेमुळे प्रकार उघडकीस

मोशी (पिंपरी-चिंचवड) – येथील आदर्शनगर परिसरातील गट नं. ४५४ मध्ये ‘अक्सा बेकरी’च्या नावाखाली गेल्या ५ वर्षांपासून चालू असलेला अत्यंत भयंकर, किळसवाणा आणि मानवी आरोग्यास घातक असा प्रकार उघडकीस आला आहे. एकाच छताखाली बेकरी उत्पादनांचे उत्पादन आणि बाजूलाच गोवंशियांची अवैध हत्या अन् विक्री चालू असल्याचा प्रकार समोर आला आहे. १८ जुलैच्या रात्री स्थानिक हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ते आणि ‘सकल हिंदु समाज’ यांच्या सतर्कतेमुळे पोलिसांच्या साहाय्याने या ठिकाणी धाड घालण्यात आली. यानंतर १९ जुलैला अन्न आणि औषध प्रशासनाचे अन्न सुरक्षा अधिकारी प्रशांत शिवराज लोहार यांच्या नेतृत्वाखाली मोहीम राबवण्यात आली. या कारवाईत बेकरीची अवस्था बिकट असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर कलम ३४ अन्वये व्यवसाय कायमस्वरूपी बंद करण्याचा आदेश देण्यात आला आहे.

किळसवाणा प्रकार आणि धर्मांधांचा उद्दामपणा !

या बेकरीमध्ये बनवले जाणारे टोस्ट, मफिन्स आणि इतर बेकरी पदार्थ अत्यंत घाणेरड्या अन् दूषित वातावरणात सिद्ध केले जात होते. ज्या ठिकाणी हे खाद्यपदार्थ सिद्ध होत होते, त्याच्या अगदी शेजारीच गोवंशियांचे मटण कापले आणि विकले जात होते. पिंपरी-चिंचवड शहरातील १०० हून अधिक दुकानांमध्ये हे दूषित आणि किळसवाणे पदार्थ प्रतिदिन पुरवले जात होते.

पडताळणीत आढळलेली गंभीर आणि किळसवाणी वस्तूस्थिती

  • बेकरी पदार्थांमध्ये, उघड्यावर ठेवलेल्या फुटलेल्या अंड्यांमध्ये, मैदा, साखर आणि तेल यांमध्ये माशा अन् कीटक पडलेले आढळले.
  • फुटलेल्या ‘डीप फ्रीजर’मध्ये अस्वच्छ पाणी आणि कीटकांनी दूषित झालेले अन्न साठवले होते.
  • अन्न हाताळणार्‍या १० कामगारांची कोणतीही आरोग्य पडताळणी झालेली नव्हती. कामगारांच्या डोक्यावर कॅप, हातात हातमोजे (ग्लोव्हज) किंवा ॲप्रन (अंगफलक) काहीही नव्हते.
  • बेकरीत वापरल्या जाणार्‍या पाण्याचा कोणताही चाचणी अहवाल नव्हता, तसेच खरेदी-विक्री किंवा ‘पेस्ट कंट्रोल’ची (कीटक नियंत्रणाची) कोणतीही नोंद नव्हती.

संपादकीय भूमिका

गेल्या ५ वर्षांपासून हा प्रकार सर्रास चालू असतांना अन्न आणि औषध प्रशासन, तसेच स्थानिक पालिका प्रशासन झोपले होते का ? ‘सकल हिंदु समाज’ आणि स्थानिक हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ते सतर्क राहून धाड घालतात, तेव्हाच प्रशासनाला जाग येते, हे संतापजनक आहे ! बेकरीच्या आडोशाने चालणार्‍या गोवंशियांच्या अवैध हत्येमागे कोणते मोठे जाळे कार्यरत आहे का ? याचाही पोलिसांनी मुळापासून शोध घेतला पाहिजे !