MSRTC : स्वच्छतेसाठी जनतेकडून कोट्यवधी रुपये घेऊनही बस आगारांची दुःस्थिती कायम !

  • राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बस आगारांच्या ‘स्वच्छता मोहीमे’चे अपयश !

  • १ ऑगस्ट या दिवशी परिवहन मंत्री मोहिमेची आढावा बैठक घेणार

  • स्वच्छता मोहीम राबवूनही दुःस्थिती कायम

. . . पण प्रत्यक्षात परिस्थिति वेगळीच !

मुंबई – राज्य मार्ग परिवहन महामंडळाने प्रवाशांना स्वच्छ आणि दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी १ जूनपासून राज्यव्यापी स्वच्छता मोहीम चालू केली. त्यासाठी प्रवाशांकडून २ रुपये अधिभार (अतिरिक्त शुल्क) आकारला जातो. प्रतिदिन ५० लाख प्रवाशांकडून १ कोटी रुपये स्वच्छतेसाठी जमा होतात. राज्यभरातील ५६० हून अधिक बस आगार, स्वच्छतागृहे, बसस्थानक परिसर आणि बसगाड्या यांच्या नियमित स्वच्छतेचे काम परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी संसदेसारखी उच्च दर्जाची वास्तू स्वच्छ करणार्‍या आस्थापनाच्या अंतर्गत असलेल्या अन्य एका आस्थापनाला दिले; मात्र त्या तुलनेत स्वच्छता राखली जात नाही. या पार्श्वभूमीवर परिवहनमंत्र्यांनी १ ऑगस्ट या दिवशी आढावा बैठक बोलावली आहे. यात स्वच्छतेसाठी नियुक्त केलेल्या खासगी संस्थेच्या कामगिरीचा आढावा, अधिभारातून जमा झालेल्या निधीचा वापर, आगारातील प्रत्यक्ष स्वच्छतेची स्थिती, तसेच पुढील सुधारात्मक उपाययोजनांवर चर्चा होईल.

बसस्थानकाच्या परिसरात दुर्गंधी, पाण्याचा निचरा न होणे, अस्वच्छ फरशा, तुटलेली स्वच्छता उपकरणे आणि कचर्‍याचा ढीग, अस्वच्छ हस्तप्रक्षालनपात्रे, तसेच शौचालयात अस्वच्छता आढळून येते. पावसाळ्यात ही समस्या अधिक गंभीर होते. चिखल, साचलेले पाणी आणि अस्वच्छ परिसर, यांमुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतो.

संपादकीय भूमिका

  • मोहीम राबवूनही, तसेच स्वच्छतेचे कंत्राट देऊनही बस आगारांत दुःस्थिती आढळून येत असेल, तर सरकार संबंधितांविरुद्ध कारवाई करणार का ?
  • २ रुपये अधिभार घेऊनही अस्वच्छताच पहावी लागत असेल, तर ही प्रवाशांची फसवणूकच होय !