न्यायालयाच्या दंडात्मक कारवाईनंतरही छत्रपती शिवाजी पथावर मासेविक्री चालूच !

राजापूर येथील नागरिकांकडून ठोस कारवाई करण्याची मागणी !

राजापूर, २२ जुलै (वार्ता.) – शहरातील शिवाजी पथावर सार्वजनिक ठिकाणी मासेविक्री करून अस्वच्छता आणि दुर्गंधी पसरवल्याप्रकरणी राजापूरच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी नुकताच १२ महिलांना प्रत्येकी २ सहस्र रुपयांचा दंड ठोठावला होता; मात्र तरीही २१ जुलैला काही महिला त्याच परिसरात मासे विक्री करतांना दिसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. त्यामुळे न्यायालयीन कारवाईनंतरही जर या मासे विक्री करणार्‍या महिला घाबरत नसतील, तर त्यांना नक्की कुणाचा पाठिंबा आहे ? असा प्रश्नही विचारला जात आहे.

न्यायालयाच्या दंडात्मक कारवाईनंतर शिवाजी पथ येथे होणारी मासे विक्री बंद होईल, अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त केली जात होती; मात्र नागरिकांची अपेक्षा फोल ठरली. त्यामुळे नगर परिषद आणि पोलीस प्रशासनाने या प्रकाराची तातडीने नोंद घेऊन संबंधितांवर सातत्याने कठोर कारवाई करावी असे मागणी केली जात आहे.

राजापूर नगर परिषदेने मासेविक्रीसाठी स्वतंत्र जागा उपलब्ध करून दिलेली असल्याचे यापूर्वी स्पष्ट करण्यात आले आहे. अशा परिस्थितीत सार्वजनिक रस्त्यावर मासेविक्री होत असल्यास त्यावर सातत्याने कायदेशीर कारवाई होणे आवश्यक असल्याचे मत नागरिक व्यक्त करत आहेत. रस्त्यावर मासेविक्रीमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होण्यासमवेत परिसरात दुर्गंधी आणि अस्वच्छता पसरत असल्याची तक्रारही नागरिकांकडून करण्यात येत आहे.

न्यायालयाच्या आदेशानंतरही नियमांचे उल्लंघन होत असल्यास संबंधित यंत्रणांनी कायद्याच्या चौकटीत राहून योग्य ती कारवाई करावी आणि शहरातील स्वच्छता आणि सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने प्रभावी उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.