प.पू. गुरुदेवांप्रती भाव असलेल्या राजापूर येथील सौ. स्मिता प्रभुदेसाई (वय ७२ वर्षे) यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !

सौ. स्मिता प्रभुदेसाई

रत्नागिरी, १ जानेवारी (वार्ता.) – आपत्काळ चालू झाला असून यापुढे तो अधिक तीव्र होणार आहे. आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी व्यष्टी आणि समष्टी साधनेचे प्रयत्न वाढवायला हवेत. प्रत्येक प्रसंगात स्थिर रहाणे, प्रसंग स्वीकारणे, त्यातून शिकणे, प्रसंगाकडे साधना म्हणून पहाणे महत्त्वाचे आहे. आध्यात्मिक उन्नत्ती करणे, हे आपले अंतिम ध्येय आहे, असे मार्गदर्शन सनातनचे सद्गुरु सत्यवान कदम यांनी केले. १ जानेवारी या दिवशी ऑनलाईन सत्संगात ते बोलत होते. याच सत्संगात दळणवळण बंदीच्या काळात साधनेचे चांगले प्रयत्न करणार्‍या राजापूर येथील सौ. स्मिता प्रभुदेसाई यांनी त्यांचे प्रयत्न सांगितले. त्यांचे प्रयत्न ऐकतांना अनेक साधकांची भावजागृती होत होती. त्यानंतर सद्गुरु सत्यवान कदम यांनी सौ. स्मिता प्रभुदेसाईकाकूंची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के झाली असून त्या जन्ममृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त झाल्या आहेत, अशी आनंदवार्ता दिली. ही आनंदवार्ता ऐकताच सर्व साधकांनी मनोमन गुरुदेवांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.