भारताचे पहिले शिक्षणमंत्री अबुल कलाम आझाद यांच्या मनात भारताविषयी प्रेम नव्हते !- भाजपचे उत्तरप्रदेशातील मंत्री आनंद स्वरूप शुक्ला

शुक्ला यांचे सरकार सत्तेत असल्याने त्यांनी आता सरकारी यंत्रणांमधून अबुल कलाम आझाद यांचा चालू असलेला उदो उदो बंद करण्यासाठी पुढाकार घ्यावा. त्यांचा वाढदिवस हा राष्ट्रीय शिक्षण दिन म्हणून साजरा केला जातो, त्यावर बंदी आणावी, त्यांना दिलेला भारतरत्न पुरस्कार काढून घ्यावा, तसेच त्यांचे खरे स्वरूप भावी पिढीसमोर आणण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी राष्ट्रप्रेमींची अपेक्षा आहे !

देशाचे पहिले शिक्षण मंत्री अबुल कलाम आझाद यांच्यावर टिपणी करणारे भाजपचे मंत्री आनंद स्वरूप शुक्ला

बलिया (उत्तरप्रदेश) – भारताचे पहिले शिक्षणमंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांना भारत आणि भारतीयत्व यांविषयी प्रेम नव्हते, असे विधान उत्तरप्रदेशचे संसदीय कार्य राज्यमंत्री आनंद स्वरूप शुक्ला यांनी येथील जननायक चंद्रशेखर विद्यापिठात एका जाहीर कार्यक्रमात बोलतांना केले.

शुक्ला म्हणाले की,

१. आझाद यांच्यामुळे भारताची शिक्षणव्यवस्था खराब झाली. मौलाना आझाद यांच्यानंतरही अनेक लोक होते ज्यांनी देशाची शिक्षणव्यवस्था खराब केली. यामध्ये एम्.सी. छागला, नुरुल हसन आणि हुमायूं कबीर यांसारख्या लोकांचा समावेश आहे.

२. भारतातील ज्या ठिकाणच्या लोकांना ‘पाकिस्तान बनावा’ अशी इच्छा नव्हती त्या ठिकाणी पाकिस्तान बनवण्यात आला; मात्र ज्या ठिकाणच्या लोकांना ‘पाकिस्तान व्हावा’, अशी इच्छा होती ते सर्वजण भारतातच राहिले.

३. इतिहासकारांनी इतिहासात औरंगजेबाने केलेला अन्याय आणि अत्याचार यांना जागा दिली नाही, तसेच अकबराला मात्र महान सांगण्याचे काम केले. इतिहासकारांनी कायमच ‘अखंड भारता’चा आग्रह धरणार्‍यांना ‘धर्मांध’ संबोधले.