तमिळनाडू : गोहत्या करणार्‍यांना पाठीशी घालणार्‍या मुसलमान संघटनांचा हिंदुत्वनिष्ठांकडून निषेध !

  • गोहत्येला विरोध करणार्‍या ‘भारत हिंदु मुन्नानी’चे (भारत हिंदु पक्षाचे) संस्थापक श्री. शिवाजी यांच्यावर २०० मुसलमानांनी केले होते आक्रमण

  • पोलिसांत तक्रार

(प्रतिकात्मक छायाचित्र)

चेन्नई (तमिळनाडू) – येथे १६ जुलैच्या रात्री ‘भारत हिंदु मुन्नानी’चे संस्थापक अध्यक्ष श्री. शिवाजी यांनी वासरांची हत्या रोखण्यासाठी येथील एच्-८ पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. ज्या ठिकाणी वासरांची हत्या करण्यात येणार होती, त्या ठिकाणी ते पोलिसांना घेऊन गेले. या वेळी गोहत्या करणार्‍या संबंधिताने मुसलमान संघटनांना पोलीस कारवाईची माहिती दिली. यामुळे घटनास्थळी २०० हून अधिक मुसलमान जमा झाले. त्यांनी पोलिसांच्या उपस्थितीत श्री. शिवाजी यांना मारहाण केली. त्यांचे वाहन हिसकावून घेतले आणि त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली. (जे पोलीस हिंदुत्वनिष्ठ नेत्यांचे रक्षण करू शकत नाहीत, ते सर्वसामान्य हिंदूंचे रक्षण काय करणार ? तमिळनाडू पोलिसांचा निषेध करावा तेवढा थोडा ! – संपादक) या सर्व घटनांचे तपशील आणि व्हिडिओ पुरावे प्रसारमाध्यमांमध्ये नोंदवले गेले आहेत, असे सांगत ‘भारत हिंदु मुन्नानी’ने १९ जुलैला पोलिसात तक्रार केली. संघटनेचे तमिळनाडू अध्यक्ष श्री. आर्.डी. प्रभु यांनी ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीला ही माहिती दिली.

मुसलमान संघटना हिंदूंच्या विरोधात रचत आहेत कथानक ! – भारत हिंदु मुन्नानी

‘गोवंश हत्या रोखणे’, ‘गोमांस विक्रीची दुकाने बंद पाडणे’ किंवा ‘वासरांची हत्या करू नये आणि त्यांचे मांस खाऊ नये’ असा खोटा ‘नॅरेटिव्ह’ (अपप्रचार) पसरवून एस्.डी.पी.आय. (सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया) या कट्टरतावादी पक्षाशी संबंधित मुसलमान संघटनांनी हे तणावाचे वातावरण जाणीवपूर्वक निर्माण केल्याचे उघड होत आहे, असा आरोप या वेळी भारत हिंदु मुन्नानीने केला. संघटनेने या कृत्याचा तीव्र निषेध करत ‘मुसलमान संघटनांनी राजकीय हेतूने प्रेरित होऊन खालच्या दर्जाचे कृत्य केले’, असे स्पष्ट केले.

काय आहे हिंदुत्वनिष्ठांची मागणी ?

अशा कृत्यांमध्ये सहभागी असलेल्या मुसलमान संघटना, अफवा पसरवणारे आणि प्रसारमाध्यमांमध्ये खोटी विधाने करणारे यांच्यावर चेन्नई महानगर पोलिसांनी कडक कारवाई करावी. त्यांच्यावर कारवाई झाली नाही, तर सर्व मित्रपक्ष हिंदु संघटना एकत्र येऊन पोलीस ठाण्यासमोर भव्य आंदोलन आणि घेराव घालतील, अशी चेतावणी देण्यात आली आहे.

संपादकीय भूमिका

बहुसंख्य हिंदू असलेल्या राज्यात गोहत्या करणार्‍यांचा उदो उदो होतो, असे व्हायला तमिळनाडू भारतात आहे कि पाकिस्तानात ? अशा घटना थांबवायच्या असतील, तर भारताला हिंदु राष्ट्र घोषित करणेच आवश्यक !