(म्हणे) ‘गेल्या वर्षी झालेला संघर्ष पंतप्रधान मोदी आणि पाकचे सैन्यदलप्रमुख असिम मुनीर यांच्यातील संगनमत होते !’ – Imran Khan Sister’s Claim

  • इम्रान खान यांची बहीण नोरीन नियाझी यांचा दावा

  • नोरीन यांना अन्वेषण यंत्रणेने चौकशीसाठी बोलावले !

इम्रान खान यांची बहीण नोरीन नियाझी व पाकचे सैन्यदलप्रमुख असिम मुनीर

इस्लामाबाद (पाकिस्तान) – मे २०२५ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेला संघर्ष (ऑपरेशन सिंदूर) हा पाकिस्तानचे सैन्य नेतृत्व असिम मुनीर आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संगनमताचा परिणाम होता. पाकिस्तानी सैन्याची प्रतिमा सुधारणे, हाच या मागचा उद्देश होता. तुम्हाला काय वाटते ? भारतासारखा मोठा देश १० मे या दिवशी पाकिस्तानने केलेल्या आक्रमणाला चोख प्रत्युत्तर देण्याच्या स्थितीत नव्हता का ? तो प्रत्युत्तर देऊ शकत होता; पण एका परस्पर समजुतीमुळे भारताने जाणूनबुजून कठोर पाऊल उचलले नाही, असा आरोप माजी पंतप्रधान इम्रान खान यांची बहीण नोरीन नियाझी यांनी केला. यानंतर पाकिस्तानच्या सायबर गुन्हे अन्वेषण यंत्रणेने त्यांना समन्स बजावून येथील कार्यालयात उपस्थित रहाण्यास सांगितले. त्यांच्यावर सामाजिक माध्यमांद्वारे सैन्याची अपकीर्ती करण्यासमेवतच खोटी, आक्षेपार्ह आणि प्रक्षोभक माहिती पसरवल्याचा आरोप करण्यात आला आहे.

१. नोरीन नियाझी यांनी एका मुलाखतीत पहलगाम येथील आतंकवादी आक्रमणानंतर ४ दिवस चाललेल्या संघर्षात भारताच्या विरोधात पाकिस्तानने केलेल्या सैनिकी कारवाईला कमी लेखले. तसेच भारताने हा संघर्ष पुढे वाढवला नाही; कारण पाकिस्तान इस्रायलला मान्यता देण्याच्या दिशेने पावले टाकत होता. या संपूर्ण घडामोडींचा उद्देश पाकिस्तानसाठी ‘अब्राहम करारा’त समावेश होण्याचा मार्ग सिद्ध करणे हा होता, असेही त्या म्हणाल्या.

२. पाकिस्तान अशा देशांपैकी एक आहे जो इस्रायलला देश म्हणून मान्यता देत नाही आणि त्यांचे इस्रायलसमवेत कोणतेही राजनैतिक संबंध नाहीत. दुसरीकडे अमेरिकेच्या मध्यस्थीने झालेल्या अब्राहम करारांतर्गत इस्रायल, संयुक्त अरब अमिरात, बहरीन, सुदान, मोरोक्को यांसह अनेक अरब देशांमध्ये राजनैतिक, आर्थिक आणि सुरक्षा संबंध प्रस्थापित झाले आहेत.