भारत, रशिया आणि चीन यांच्यातील दृढ संबंध जागतिक स्थैर्यासाठी महत्त्वाचे ! – China

भारत आणि पाकिस्तान यांच्यासमवेतचे वाद संवादातून सोडवण्याचे आवाहन

चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते लिन जियान

बीजिंग (चीन) – भारत, रशिया आणि चीन यांच्यातील दृढ संबंध जागतिक सुरक्षा आणि स्थैर्य यांसाठी महत्त्वाचे असून तिन्ही देश यासाठी सहमत आहेत, अशी भूमिका चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते लिन जियान यांनी नियमित पत्रकार परिषदेत मांडली. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी अलीकडेच भारत, रशिया आणि चीन यांच्यातील संबंधांचे महत्त्व अधोरेखित केले. त्या पार्श्वभूमीवर चीनने त्याची भूमिका स्पष्ट केली.

लिन जियान पुढे म्हणाले की, भारत, रशिया आणि चीन या तीनही उदयोन्मुख अर्थव्यवस्था असून त्यांच्यातील चांगले संबंध केवळ संबंधित देशांच्याच नव्हे, तर प्रादेशिक आणि जागतिक हितासाठीही आवश्यक आहेत. त्रिपक्षीय सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी चीन भारत आणि रशिया यांच्याशी संवाद कायम ठेवण्यास चीन सिद्ध आहे. प्रत्यक्ष नियंत्रणरेषेवरवरील परिस्थिती सर्वसाधारणपणे स्थिर आहे. दोन्ही देशांमधील संवादयंत्रणा कार्यरत असून मतभेद संवादाद्वारे सोडवले जावेत. भारत आणि चीन यांनी एकमेकांकडे स्पर्धक म्हणून नव्हे, तर सहकार्य भागीदार म्हणून पहावे. भारत-पाकिस्तानमधील मतभेदही संवाद आणि चर्चेद्वारे सोडवावेत.

संपादकीय भूमिका

  • चीनच्या विस्तारवादी मानसिकतेमुळे त्याचे भारताशीच नव्हे, तर अनेक देशांशी संबंध बिघडलेले आहेत. त्यामुळे प्रथम त्याने अन्य देशांच्या भूभागांवरील दावे सोडून द्यावेत, तरच त्याचे अन्य देशांशी दृढ संबंध निर्माण होतील, असे चीनला ठणकावून सांगणे आवश्यक आहे !
  • भारत आणि पाकिस्तान यांच्या प्रश्नांत नाक खुपसण्याचा चीनला काय अधिकार ?, असा जाब भारत सरकार चीनला विचारणार का ?