बकरी ईदच्या निमित्ताने सोलापूरमधील हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रादेशिक परिवहन अधिकार्‍यांना निवेदन !

गोवंश संरक्षणासाठी अधिकार्‍यांना निवेदन देतांना हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे कार्यकर्ते, गोसेवक, हिंदु संघटनांचे प्रतिनिधी (संकेतस्थळ)

सोलापूर – बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर अवैध गोवंश वाहतूक, क्षमतेपेक्षा अधिक जनावरे भरून होणारी वाहतूक आणि प्राण्यांवरील क्रूरतेच्या घटनांवर कठोर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी हिंदु राष्ट्र सेना, मानद पशूकल्याण अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी प्रादेशिक परिवहन अधिकारी (आर्.टी.ओ.) सोलापूर यांना निवेदन दिले.

यामध्ये महाराष्ट्र शासनाचे आदेश, प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायदे, महाराष्ट्र पशूसंवर्धन अधिनियम, तसेच उच्च न्यायालयाच्या निर्देशांची काटेकोर कार्यवाही करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली. शासनाच्या २१ मे २०२६ च्या परिपत्रकानुसार अवैध गोतस्करी रोखण्यासाठी विशेष पडताळणी मोहीम राबवून दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच महाराष्ट्र शासन नियुक्त मानद पशूकल्याण अधिकारी केतनभाई शहा यांनी गोवंश संरक्षण हा सार्वजनिक सुव्यवस्था आणि समाजहिताशी संबंधित गंभीर विषय असल्याचे सांगितले. हिंदु राष्ट्र सेना जिल्हाप्रमुख श्री. रवि अण्णा गोणे यांनी अवैध गोतस्करी करणार्‍यांवर कठोर गुन्हे नोंद करून संबंधित वाहनांचे परवाने रहित करण्याची मागणी केली. या वेळी भाजपचे नगरसेवक सतीश अण्णा सिरसिल्ला, भाजप ओबीसी मोर्चा शहराध्यक्ष विजय महिंद्रकर, ‘जगदंब सामाजिक बहुउद्देशीय संस्थे’चे अध्यक्ष विजय यादव आदी उपस्थित होते.