यज्ञ करण्यामागील सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांचा व्यापक आणि उदात्त हेतू !

वैदिक धर्मपरंपरेत यज्ञ ही केवळ एक धार्मिक क्रिया नसून ती समष्टी कल्याणासाठीची दिव्य साधना मानली गेली आहे. ऋषिमुनींनी यज्ञसंस्कृतीद्वारे विश्वाच्या कल्याणाचा मार्ग दर्शवला. त्या परंपरेचा वारसा पुढे चालवत गुरुदेवांनी आतापर्यंत विविध यज्ञांचे आयोजन केले आहे. या यज्ञांमागे केवळ वैयक्तिक किंवा स्थानिक हित नसून साधकांचे रक्षण आणि हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी आवश्यक आध्यात्मिक बळ प्राप्त व्हावे, हा अत्यंत व्यापक अन् उदात्त हेतू आहे.

‘यज्ञकुंडाचा आतील भाग पांढरा असल्यास तो ज्वाळांमुळे काळा झाल्याने चांगला दिसत नाही. यासाठी तो भाग मातीने सारवावा’, असे पुरोहितांना सांगतांना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१. सूक्ष्म मार्गदर्शन !

यज्ञपरंपरा ही केवळ ग्रंथाधारित नसून ती ऋषिमुनींच्या सजीव मार्गदर्शनातून विकसित झालेली परंपरा आहे. जीवनाडीपट्टीतील वाचनात वेळोवेळी विविध यज्ञ सांगितले गेले आणि त्या यज्ञांद्वारे साधले गेलेले परिणामही अनुभवातून स्पष्ट झाले आहेत.

नाडीपट्टीतील लिखाणाद्वारे सनातन संस्थेच्या धर्मकार्याला मार्गदर्शन मिळणे, ही अत्यंत अमूल्य आणि दुर्मिळ अशी गोष्ट आहे. सूक्ष्म मार्गदर्शनामुळे यज्ञांचे स्वरूप, पद्धती आणि उद्देश अधिक स्पष्ट अन् प्रभावी होतात. त्यामुळे यज्ञकार्य केवळ कर्मकांड न रहाता, दैवी संकल्प पूर्ण करणारी साधना बनते.

२. निष्कर्ष

यज्ञ ही केवळ कर्मकांडात्मक प्रक्रिया नसून ती समष्टी उन्नती, साधकसंरक्षण आणि धर्मसंवर्धन यांची प्रभावी साधना आहे. गुरुदेवांनी केलेले यज्ञ हे नाडीपट्टीत उल्लेखल्यानुसार व्यापक हिताच्या संकल्पाने प्रेरित असून त्यांद्वारे साधकांना आध्यात्मिक बळ प्राप्त होऊन धर्मकार्य अधिक समर्थपणे पुढे जात आहे.

– श्री. अमर जोशी, सनातन वेदपाठशाळा

आश्रमातील यज्ञकार्याची व्याप्ती !

गुरुदेवांच्या मार्गदर्शनाखाली आश्रमात आतापर्यंत ५०० हून अधिक यज्ञ झाले आहेत. त्यामध्ये विविध देवता आणि तत्त्वे यांना उद्देशून केलेले यज्ञ समाविष्ट आहेत, जसे की, दशमहाविद्या यज्ञ, चंडी होम, वाराही होम, नरसिंह होम, इंद्राक्षी होम, हनुमान कवच यज्ञ, पंचमहाभूत यज्ञ इत्यादी या सर्व यज्ञांद्वारे सूक्ष्म स्तरावर व्यापक कार्य साधले गेले आहे.

१. विश्वशांतीसाठी संकल्प

श्री. अमर जोशी

प्रत्येक यज्ञामध्ये संकल्प करतांना समष्टी कल्याण आणि विश्वशांती यांचा विचार अग्रक्रमाने केला जातो. यज्ञातून निर्माण होणारी सात्त्विक ऊर्जा ही सूक्ष्म पातळीवर सर्वत्र प्रसारित होत असल्याचे शास्त्र सांगते.

२. यज्ञसंस्कृतीचे जतन

आजच्या काळात यज्ञसंस्कृती लोप पावत चालली असतांना अशा यज्ञांद्वारे तिचे जतन आणि पुनरुज्जीवन होते. वेदाधारित विधी, मंत्र आणि आचार यांचे संरक्षण होते.

३. साधकांना चैतन्यप्राप्ती आणि आध्यात्मिक संरक्षण

ज्या ठिकाणी यज्ञ होतो, तेथील साधकांना चैतन्याचा लाभ होतो. यज्ञातून निर्माण होणार्‍या सात्त्विक लहरींमुळे साधकांचे आध्यात्मिक कष्ट न्यून होण्यास साहाय्य होते.

४. अनुभूतींमुळे श्रद्धावृद्धी

यज्ञकाळात साधकांना विविध आध्यात्मिक अनुभूती येतात. त्यामुळे श्रद्धा दृढ होऊन साधना अधिक भावपूर्ण होते.

५. स्थळशुद्धी आणि सात्त्विकतेची वृद्धी

यज्ञ केलेल्या स्थळाची सूक्ष्म शुद्धी होऊन त्या ठिकाणी सात्त्विकता वाढते. वातावरण अधिक पवित्र आणि साधनेस अनुकूल बनते.

६. हविर्भागाचे दीर्घकालीन परिणाम

यज्ञातील हविर्भागाचे परिणाम दीर्घकालीन असतात. वातावरणातील सूक्ष्म संतुलन साधले जाऊन पर्जन्यवृद्धीसारखे परिणामही घडतात. सोमयागाद्वारे पुढील काळात पावसासाठी अनुकूलता निर्माण होणे, हे त्याचे उदाहरण आहे.

– श्री. अमर जोशी, सनातन वेदपाठशाळा

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या काही वेळा अनिष्ट शक्तींमुळे किंवा ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांना / संतांना / धर्मप्रेमींना आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील, असे नाही. - संपादक