कलियुगातील भगवान परशुरामाचे अंशावतार असलेले पू. भार्गवराम प्रभु (सनातनचे पहिले बालसंत, वय ९ वर्षे) यांची आध्यात्मिक वैशिष्ट्ये !

वैशाख शुक्ल दशमी (२६.४.२०२६) या दिवशी सनातनचे पहिले बालसंत पू. भार्गवराम भरत प्रभु यांचा ९ वा वाढदिवस झाला. त्यानिमित्त सुश्री मधुरा भोसले यांना पू. भार्गवराम प्रभु यांचा ‘विविध युगांतील साधनाप्रवास आणि त्यांची गुणवैशिष्ट्ये’, यांसदर्भात मिळालेले सूक्ष्मातील ज्ञान २५.४.२०२६ या दिवशी जाणून घेतले. आज त्याचा पुढचा भाग जाणून घेऊया.

या लेखाचा भाग १  वाचण्याकरिता येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/1033348.html

(भाग २)

५. पू. भार्गवराम यांच्या ‘ब्रह्मोपदेश’, म्हणजे ‘उपयनयन संस्कारा’च्या वेळी सूक्ष्म स्तरावर घडलेल्या वैशिष्ट्यपूर्ण घटना !

‘५.२.२०२६ या दिवशी पू. भार्गवराम यांचा ‘ब्रह्मोपदेश’, म्हणजे ‘उपयनयन संस्कार’ झाला. तेव्हा सूक्ष्मातून पुढील दिव्य घटना घडल्या.

उपनयन संस्कार सोहळ्यातील पू. भार्गवराम प्रभु यांची भावमुद्रा

५ अ. श्री गणेशाने कार्यक्रमस्थळाचे वाईट शक्तींपासून रक्षण करणे : विधीच्या आरंभापासून विधी पूर्ण होईपर्यंत श्री गणेशाचे तत्त्व कार्यक्रमस्थळी कार्यरत होते. या धार्मिक विधीमध्ये विघ्न निर्माण करण्यासाठी वाईट शक्तींनी पुष्कळ प्रयत्न केले. तेव्हा विधीच्या आधी केलेल्या ‘गणहोमा’तून श्री गणेशाचे ‘विघ्नहर्ता’, हे रूप प्रगट झाले आणि त्याने कार्यक्रमस्थळी चैतन्यदायी अभेद्य संरक्षककवच निर्माण करून वाईट शक्तींपासून कार्यक्रमस्थळाचे रक्षण केले.

५ आ. वरुणदेवाच्या आज्ञेने पवित्र सप्तनद्यांनी पू. भार्गवराम यांना सूक्ष्मातून स्नान घालणे आणि सप्तसरस्वतींनी जलाभिषेक करणे : पू. भार्गवराम यांच्या स्नानाच्या वेळी वरुणदेवाच्या आज्ञेने ‘१. गंगा, २. यमुना, ३. सरस्वती, ४. गोदावरी, ५. नर्मदा, ६. सिंधु आणि ७. कावेरी’, या सप्तनद्या सूक्ष्मातून प्रगट झाल्या अन् त्यांनी वात्सल्यभावाने पू. भार्गवराम यांना स्नान घातले. त्यामुळे पू. भार्गवराम यांच्या स्थूल आणि सूक्ष्म, अशा सर्व देहांची शुद्धी झाली. जेव्हा पुरोहित स्थुलातून त्यांच्यावर अभिमंत्रित जलाने प्रोक्षण करत होते, तेव्हा वरुणदेवाने त्या अभिमंत्रित जलात प्रथम आकाशगंगेतील तीर्थ मिसळले. त्यानंतर त्याने ब्रह्मदेवाच्या कमंडलूतील ‘सुप्रभा, कांचनाक्षी, विशाला, मनोरमा, ओघवती, सुरेणु आणि विमलोदका’, या सप्तसरस्वतींचे आवाहन करून त्यांच्या एकत्रित तीर्थाने पू. भार्गवराम यांना मंगल जलाभिषेक केला. त्यामुळे पू. भार्गवराम यांच्या भोवती पिवळसर सोनेरी रंगाचे दिव्य प्रभामंडल कार्यरत झाल्याने ते अधिक तेजस्वी दिसू लागले.

५ इ. जेव्हा पू. भार्गवराम यांनी जानवे धारण केले, तेव्हा त्यांच्या सूर्यनाडीमध्ये सूर्याचे तेज, चंद्रनाडीमध्ये चंद्राची शीतलता आणि सुषुम्नानाडीमध्ये साक्षात् आदिशक्तीचे दिव्य तेज कार्यरत झाले.

सुश्री (कु.) मधुरा भोसले

५ ई. विविध देवता आणि ऋषिमुनी सूक्ष्मातून कार्यक्रमस्थळी उपस्थित असणे : या संपूर्ण कार्यक्रमाला इंद्रादी देवता आणि देवर्षि नारद सूक्ष्मातून उपस्थित होते, तसेच देवगुरु बृहस्पति अन् देवर्षि नारद यांनी पुरोहितांच्या माध्यमातून विविध मंत्रोच्चार करून विधीत सहभाग घेतला. हा संपूर्ण विधी मुख्य पुरोहितांच्या रूपात महर्षि भृगु यांनी केला; कारण आध्यात्मिकदृष्ट्या पू. भार्गवराम हे भृगु वंशातील उत्तराधिकारी आहेत.

५ उ. सनातनचे तिन्ही मोक्षगुरु संपूर्ण कार्यक्रमात सूक्ष्मातून उपस्थित असणे : सनातन संस्थेचे तिन्ही मोक्षगुरु सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, श्री महालक्ष्मी स्वरूपिणी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ, हे संपूर्ण कार्यक्रमात सूक्ष्मातून उपस्थित होते.

५ उ १. तिन्ही मोक्षगुरूंनी पू. भार्गवराम यांना सूक्ष्मातून धर्मदंड देणे : पू. भार्गवराम यांना तिन्ही मोक्षगुरूंच्या हस्ते सूक्ष्मातून धर्मदंड प्राप्त झाला. तेव्हा देवतांनी सूक्ष्मातून पू. भार्गवराम यांच्यावर दैवी सुवासिक फुलांची वृष्टी केली. याची प्रचीती म्हणून कार्यक्रमाच्या ठिकाणी लाल, गुलाबी, मोरपिशी, केशरी, चंदेरी, सोनेरी इत्यादी रंगांचे दैवी कण दिसले. पू. भार्गवराम यांच्या उपनयन संस्काराच्या वेळी काढलेले छायाचित्र पाहिल्यावर धर्मदंड आणि भगवी वस्त्रे धारण केलेल्या ८ वर्षांच्या आद्य शंकराचार्यांच्या दिव्य स्वरूपाचे पू. भार्गवराम यांच्यात दर्शन झाले. पू. भार्गवराम पुढे धर्मगुरूंच्या रूपात कार्यरत होऊन पृथ्वीवर धर्मसंस्थापना करणार आहेत.

५ उ २. तिन्ही मोक्षगुरूंनी पू. भार्गवराम यांना विविध आशीर्वाद देणे : श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी पू. भार्गवराम यांना भक्तीने संपन्न होण्याचा, श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी दिव्य शक्तीने संपन्न होण्याचा आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी आत्मज्ञानासह ब्रह्मज्ञानाने सुसंपन्न होण्याचा कृपाशीर्वाद दिला. तिन्ही मोक्षगुरूंनी पू. भार्गवराम यांना ज्ञान, भक्ती आणि वैराग्य यांचे वरदान देऊन उत्तम मोक्षाच्या प्राप्तीचा आशीर्वाद दिला.

६. भविष्यात पू. भार्गवराम हे मुक्ती आणि मोक्ष देणारे ‘समष्टी मोक्षगुरु’ होणार असणे

पू. भार्गवराम यांचे कार्य इतके सूक्ष्म आणि अव्यक्त आहे की, ते आपल्या अल्पशा मतीला समजणे कठीण आहे. त्यांची लीला तिन्ही मोक्षगुरूंनाच ज्ञात आहे. येणार्‍या भीषण आपत्काळात पू. भार्गवराम यांचा सत्संग आणि संकल्प यांमुळे अनेक सात्त्विक जिवांच्या प्राणांचे रक्षण होणार आहे. पू. भार्गवराम यांना अनेक जिवांचे कर्म, कर्मफळ आणि भाग्य यांचे गूढ ज्ञान आहे. त्यामुळे पुढे जेव्हा ते समष्टी स्तरावरील उच्च आध्यात्मिक उत्तराधिकारी होतील, तेव्हा ते मोक्षगुरूंच्या रूपाने अनेक जिवांना कर्मबंधनातून मुक्त करून अनेकांना मुक्ती आणि मोक्ष देतील. त्यामुळे ते संपूर्ण विश्वात अत्यंत लोकप्रिय होतील.

७. आमचे कोटी नमन अशा दिव्य अंशावताराला ।
भुजांमध्ये आहे परशुरामाचे क्षात्रतेज ।
अन् वाणीमध्ये विलसते त्यांच्या ब्राह्मतेज ।। १ ।।

दिव्य ज्ञानाने युक्त आहे त्यांचे ज्ञानतेज ।
अन् धर्मज्ञानाने संपृक्त आहे त्यांचे धर्मतेज ।। २ ।।

आम्ही वंदन करतो अशा दिव्य तेजाला ।
आमचे कोटी नमन अशा दिव्य अंशावताराला ।। ३ ।।

८. कृतज्ञता

‘श्री गुरुकृपेमुळे मला अशा दिव्य अंशावताराची आध्यात्मिक गुणवैशिष्ट्ये उमजली’, यासाठी मी श्री गुरुचरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’

– सुश्री मधुरा भोसले (सूक्ष्मातील ज्ञानप्राप्तकर्त्या साधिका, आध्यात्मिक पातळी ६५ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (४.४.२०२६)     (समाप्त)

 

  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या काही वेळा अनिष्ट शक्तींमुळे किंवा ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांना / संतांना / धर्मप्रेमींना आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील, असे नाही. - संपादक