Save Trees From Concrete : बुंध्यांपर्यंत ‘काँक्रीट’ ओतून वृक्षांची होणारी ‘मूक हत्या’ धक्कादायक !

  • ‘जागतिक वसुंधरा दिना’निमित्त ‘सुराज्य अभियाना’ची पत्रकार परिषद !

  • वृक्षारोपण केलेले १७ सहस्र वृक्ष गायब !

  • वृक्ष संवर्धनाच्या नावाखाली प्रशासनाकडून वृक्षांची हत्या करण्याचा प्रकार उघड !

(‘काँक्रीट’ म्हणजे सीमेंट, वाळू आणि खडी यांचे मिश्रण)

मुंबई – मुंबई महानगरपालिकेने १ एप्रिलपासून ‘वृक्ष संजीवनी’ अभियान चालू केले आहे. या अंतर्गत झाडांभोवतीचे काँक्रीट काढण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. सुराज्य अभियानाने या मोहिमेच्या मूळ हेतूवरच प्रश्न उपस्थित केला आहे. रस्ते विकास आणि सौंदर्यीकरण यांच्या नावाखाली वृक्षांच्या बुंध्यांपर्यंत ‘काँक्रीट’ ओतून त्यांचा गळा घोटला जात असल्याचे राज्यातील वास्तव ‘सुराज्य अभियान’चे महाराष्ट्र राज्य समन्वयक श्री. अभिषेक मुरुकटे यांनी उघड केले.

डावीकडून हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ते डॉ. उदय धुरी, ‘सुराज्य अभियाना’चे राज्य समन्वयक श्री. अभिषेक मुरुकटे, अधिवक्ता प्रथमेश गायकवाड आणि अधिवक्ता गणेश कोळी

२२ एप्रिल या दिवशी ‘जागतिक वसुंधरा दिना’च्या निमित्त मुंबई मराठी पत्रकार संघात याविषयीची पत्रकार परिषद घेण्यात आली. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ते डॉ. उदय धुरी, अधिवक्ता प्रथमेश गायकवाड आणि अधिवक्ता गणेश कोळी उपस्थित होते.

राष्ट्रीय हरित लवादाचे नियम मोडणार्‍या कंत्राटदारांविरुद्ध फौजदारी गुन्हा प्रविष्ट (दाखल) करा !

‘रस्ते बांधतांना राष्ट्रीय हरित लवादाच्या आदेशांचे उल्लंघन करून झाडांच्या बुंध्यापर्यंत काँक्रीट ओतले जाणे’, हीच सर्वांत मोठी चूक नाही का ?

‘काँक्रीट काढा’ अभियान राबवण्याऐवजी ते झाडांच्या बुंध्यापर्यंत ओतणार्‍या दोषींविरुद्ध ‘एन्.जी.टी. कायदा २०१०’ च्या कलम २६ अन्वये फौजदारी गुन्हा नोंद करा’, अशी मागणी श्री. अभिषेक मुरुकटे यांनी केली.-

सुराज्य अभियानचे प्रसिद्धीपत्रक –

सहस्रो झाडांच्या नोंदी न आढळणे, हा जनतेच्या पैशांचा दुरुपयोग !

पुणे महानगरपालिकेने मागील २ वर्षांतील १७ सहस्र ५३३ झाडांच्या सद्यःस्थितीविषयी कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध नसल्याची स्वीकृती दिली आहे. वृक्ष संवर्धन असो किंवा नवीन वृक्षारोपण, प्रशासनाने पर्यावरणाची क्रूर थट्टा चालवली आहे.

१७ सहस्र झाडांचा हिशोब नसणे, हा जनतेच्या कोट्यवधी रुपयांचा दुरुपयोग आहे, असेही श्री. मुरुकटे यांनी नमूद केले.

‘उपक्रम’ नव्हे, प्रशासनाने कारवाई करावी !

झाडांभोवतीच्या काँक्रीटीकरणामुळे भूगर्भातील जलपुनर्भरणाची प्रक्रिया खंडित झाली आहे. शहरांमधील वाढत्या उष्णतेला सर्वस्वी प्रशासनच उत्तरदायी आहे. राष्ट्रीय हरित लवादाच्या आदेशानुसार नागरी भागात वृक्षांभोवती किमान १ मीटर जागा कच्ची ठेवणे, हे सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांवर बंधनकारक आहे. झाडांवर खिळे ठोकून विज्ञापन किंवा फलक लावून त्यांचे विद्रूपीकरण करणे आणि परिणामी त्याला दुखापत पोचवणे, हे अवैध आहे. त्यामुळे केवळ ‘इव्हेंट’ (कार्यक्रम) म्हणून महिनाभर अभियान राबवून प्रशासन दायित्वातून मुक्त होऊ शकत नाही. मुळात रस्ते किंवा पादचारी मार्गांचे काम चालू असतांनाच नियमांचे पालन का केले जात नाही ? झाडांना दुखापत पोचवणे हा ‘महाराष्ट्र झाडांचे संरक्षण आणि जतन अधिनियम १९७५’ नुसार दंडनीय अपराध आहे. उल्लंघन करणारे कंत्राटदार आणि उत्तरदायी अधिकारी यांची नावे घोषित करून त्यांच्यावर कारवाई का केली जात नाही ?, असाही प्रश्न मुरुकटे यांनी उपस्थित केला.

ठोस कृती न केल्यास अवमान याचिका प्रविष्ट करण्याची चेतावणी !

झाडांच्या या गंभीर स्थितीचा प्रश्न सोडवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने  देहलीप्रमाणे स्वयंकार्यपद्धती सिद्ध करावी. राज्यातील सर्व शहरांत तातडीने ‘डी-काँक्रिटीकरण’ मोहीम राबवावी; परंतु तिचे स्वरूप तात्पुरते न ठेवता त्याची निरंतर प्रक्रिया असावी. सध्या गळा आवळलेल्या झाडांना तर मोकळे करावेच; पण नवीन रस्ते आणि पादचारी मार्ग यांच्या निविदांमध्ये झाडांभोवती १ मीटर जागा सोडल्याविना कंत्राटदारांची देयके संमत केली जाणार नाहीत, अशी अट कार्यादेशात समाविष्ट करावी. मागील ३ वर्षांतील वृक्षारोपणाचे तृतीय पक्ष लेखापरीक्षण (थर्ड पार्टी ऑडिट) करून वास्तव आकडेवारी सार्वजनिक करावी. येत्या ७ कामकाजाच्या दिवसांत प्रशासनाने ठोस कृती केली नाही, तर ‘सुराज्य अभियाना’च्या वतीने राष्ट्रीय रहित लवादाकडे अवमान याचिका प्रविष्ट केली जाईल, अशी चेतावणीही श्री. मुरुकटे यांनी दिली.

असे राबवले सुराज्य अभियान !

श्री. अभिषेक मुरुकटे, समन्वयक, सुराज्य अभियान

‘सुराज्य अभियाना’ने राज्यात पुणे, मुंबई, नागपूर, नाशिक, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, जळगाव यांसह कर्नाटकच्या हुबळी-कारवार भागांत रस्त्यांवरील वृक्षांची प्रत्यक्ष पहाणी केली.

यानंतर २२ एप्रिल या दिवशी मुंबई, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर या ठिकाणी पत्रकार परिषदा घेऊन झाडांभोवती काँक्रीट ओतून त्यांचा श्वास कोंडला जात असल्याची दयनीय स्थिती उघड केली.

यांसह मुंबईचे महापौर, महानगरपालिका आयुक्त, मुख्यमंत्री आणि पर्यावरण विभाग मंत्री, तसेच नाशिक, नागपूर, जळगाव येथे जिल्हाधिकारी, आयुक्त/मुख्याधिकारी, तसेच वृक्ष अधिकारी यांच्याकडे निवेदनांच्या माध्यमातून तातडीने कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली.

सुराज्य अभियानाचा पत्ता

सुराज्य अभियान

टपालाचा पत्ता : श्री. अभिषेक मुरुकटे, ‘सुखठणकर रिट्रिट’, फ्लॅट क्र. एजी-४, चित्तार भाट, नागेशी, फोंडा, गोवा. पिन – ४०३४०१

संपर्क : ९८६७५५८३८४

ई-मेल : [email protected]

वेबपेज  : hindujagruti.org/surajya-abhiyan

‘एक्स’ खाते : @SurajyaAbhiyan

Instagram : surajyaabhiyan