(म्हणे) ‘श्रीराम आणि कृष्ण हरणाचे मांस खायचे, मद्यही प्यायचे !’ – Dhruv Rathee

कुप्रसिद्ध यू ट्यूबर ध्रुव राठी याची हिंदुद्रोही विधाने

(‘यू ट्यूबर’ म्हणजे यू ट्यूबवर व्हिडिओ प्रसारित करणारा.)

कुप्रसिद्ध यू ट्यूबर ध्रुव राठी

नवी देहली – रामायण आणि महाभारत यांत अशी उदाहरणे सापडतात की, राम अन् श्रीकृष्ण मांस खातांना आणि मद्यसेवन करतांना दाखवण्यात आले आहे. सीता गंगा नदीला मांसाहाराचा नैवेद्य दाखवायची. तसेच ‘कृष्ण आणि अर्जुन हे दोघेही मद्यसेवन करायचे’, असे स्वामी विवेकानंद यांच्या ‘ईस्ट अँड वेस्ट’ पुस्तकातील ‘उद्योग पर्व’ या ५८ व्या धड्यात नमूद केले आहे, असा दावा प्रसिद्ध यू ट्यूबर ध्रुव राठी याने एका एका यू ट्यूब कार्यक्रमामध्ये केला आहे. (श्रीरामनवमीच्या पार्श्वभूमीवर ध्रुव राठीला ही माहिती देण्याची दुर्बुद्धी कशी सुचली ? खोटी कथानके रचून हिंदूंच्या सणांच्या काळात त्यांचा बुद्धीभेद कसा केला जात आहे, हे जाणा ! – संपादक) हा व्हिडिओ प्रसारित होत असून या विधानावरून राठी याच्यावर प्रचंड टीका केली जात आहे. तसेच राठीवर कारवाईची मागणी केली जात आहे.

(म्हणे) ‘पांडवांनी वनवासात हरणांची हत्या केल्याने ती नामशेष झाली !’

ध्रुव राठी याने पुढे म्हटले की, श्रीराम वनवासात असतांना मांस सेवन करायचे. वनवासाच्या १२ वर्षांच्या प्रदीर्घ काळात ते ‘पनीर बटर मसाला’ किंवा फळ खाऊन जगणे शक्य आहे का ? महाभारतामधील ‘वन पर्व’ या २५६ व्या अध्यायात लिहले आहे की, युधिष्ठिराला एक स्वप्न पडले होते. त्या स्वप्नात अनेक हरणे त्याच्या दिशेने येतांना दिसत आहेत; मात्र त्याच्या भावांनी या हरणांची मोठ्या प्रमाणावर हत्या केली. ही हत्या इतक्या मोठ्या प्रमाणावर करण्यात आली की, त्या वेळी हरणे नामशेष झाली होती. (मुळात महाभारत संस्कृत भाषेत लिहिले आहे. संस्कृत भाषा शिकून ती आकलन व्हायला बराच कालावधी जावा लागतो. मग जर्मनीत बसून ध्रुव राठी याला महाभारतात काय लिहिले आहे, हे कसे कळले ? – संपादक) याविषयी युधिष्ठिर शोक व्यक्त असल्याचे महाभारतात सांगण्यात आले आहे. तसेच पांडवांनी तब्बल दीड वर्षे हरणाचे मांस खाऊन काढल्याचा उल्लेखही महाभारतात आहे, असे त्याने म्हटले आहे.

संपादकीय भूमिका

ध्रुव राठी विदेशात बसून अशा प्रकारची हिंदुद्रोही आणि भारतद्रोही विधाने असणारे व्हिडिओ बनवून प्रसारित करत आहे. या प्रकरणात भारत सरकारने कठोर कारवाई करत विदेशातून त्याला अटक करून भारतात आणणे आवश्यक आहे ! इस्रायलसारखा देश असता, तर त्याने अशांना पकडून आणले असते !