Maharashtra Budget : महाराष्ट्राचा ४० सहस्र ५५२ कोटी रुपये महसुली तुटीचा अर्थसंकल्प सादर !

  • ‘पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना’ घोषित !

  • ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ चालू रहाणार !

मुंबई – पर्यावरणपूरक, पर्यावरण शेतीपूरक, सांस्कृतिक संवर्धक आणि विकसित महाराष्ट्राची संकल्पना साकार करणारा एकूण ७ लाख ६९ सहस्र ४६७ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प ६ मार्च या दिवशी विधीमंडळात सादर करण्यात आला. मागील काही वर्षांप्रमाणे हा अर्थसंकल्पही तुटीचा होता. एकूण ४० सहस्र ५५२ कोटी रुपये महसुली तुटीचा, तर १ लाख ५० सहस्र ४९१ कोटी रुपये राजकोषीय तूट असलेला हा अर्थसंकल्प होता.

अर्थ राज्यमंत्री आशिष जैसवाल आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सकारात्मक गोष्ट म्हणजे मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत या आर्थिक वर्षात १ सहस्र ४५ कोटी रुपयांची तूट घटली आहे. विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, तर विधान परिषदेत अर्थ राज्यमंत्री आशिष जैसवाल यांनी तो सादर केला.

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ चालू ठेवण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली, तसेच ‘पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना’ या नवीन योजनेची घोषणाही त्यांनी केली. प्रगतीशील, शाश्‍वत, सर्वसमावेशक आणि सुशासन या ४ तत्त्वांवर, तसेच वर्ष २०४७ पर्यंत ५ ट्रिलियन डॉलर म्हणजे अर्थसंकल्पाचे उद्दिष्ट गाठण्यासाठीच्या अनुषंगाने हा अर्थसंकल्प असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी घोषित केले.

अर्थसंकल्पाचे वाचन करण्यापूर्वी सभागृहात छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयजयकार करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी ‘अमर रहे, अमर रहे, अजित पवार अमर रहे’ अशी घोषणा दिली.

मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणा !

१. नवी मुंबई-रायगड येथे तिसरी मुंबई, तर वाढवळजवळ चौथी मुंबई होणार

२. १२ खेळांचे राज्यस्तरावर केंद्र उभारले जाणार

३. छत्रपती संभाजी महाराज यांच्या वढू बुद्रूक येथील समाधीस्थळाचे काम वर्ष २०२७ पर्यंत पूर्ण होणार 

४. गडचिरोलीत ७० सहस्र रोजगारांची निर्मिती करणार 

५. मुंबई विमानतळ ते नवी मुंबई विमानतळ मेट्रोने जोडणार

६. मुंबईत १० लाख घरांची निर्मिती करणार

७. नवी मुंबईत देशातील पहिली ‘एज्युसिटी’ उभारणार

८. निवडक विद्यार्थ्यांना इस्रो आणि नासा येथे अभ्यासासाठी पाठवणार

९. नाशिक-त्र्यंबकेश्‍वर कुंभपर्वासाठी भरीव प्रावधान

१०. राज्यात ३०० कोटी वृक्षलागवड मोहीम हाती घेणार

स्वस्त काय ?

  • मधुमेहावरील उपचार
  • कर्करोगावरील औषधे
  • क्रीडा साहित्य
  • वैद्यकीय उपकरणे
  • सौर पॅनल

महाग काय ?

  • दारू
  • सिगारेट
  • तंबाखूजन्य पदार्थ

हा अर्थसंकल्प म्हणजे महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाचा ‘रोडमॅप’ ! – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

(‘रोडमॅप’ म्हणजे ध्येय गाठण्यासाठी सिद्ध केलेली टप्प्याटप्प्याने कृतीची योजना)

देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

हा अर्थसंकल्प राज्याला ५ ट्रिलियन डॉलरची (४६० लाख कोटी रुपयांची) अर्थव्यवस्था बनवण्याच्या दिशेने टाकलेले एक प्रबळ पाऊल असून यात शेतकरी, महिला आणि तरुण यांच्या सक्षमीकरणावर मुख्य भर दिला आहे. ‘पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजने’च्या माध्यमातून २ लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी दिली आहे, तर ३७ लाख महिलांना ‘लखपती दीदी’ सिद्ध करून महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्याचा पाया भक्कम केला आहे. हा अर्थसंकल्प महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाचा ‘रोडमॅप’ आहे.

‘विकसित महाराष्ट्र २०४७’कडे वाटचाल करणारा अर्थसंकल्प ! – एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री

एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री

हा अर्थसंकल्प म्हणजे केवळ आकड्यांचा खेळ नाही, तर महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्याचा पाया आहे. अर्थसकंल्प ‘विकसित महाराष्ट्र २०४७’कडे वाटचाल करणारा आहे. आजच्या अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांवर भर देण्यात आला आहे.

शेतकर्‍यांना २ लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी !

‘पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजने’च्या अंतर्गत ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत पीक कर्ज थकीत असणार्‍या शेतकर्‍यांना २ लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्यात येणार आहे. यासह नियमित कर्जफेड करणार्‍या शेतकर्‍यांसाठी ५० सहस्र रुपये प्रोत्साहनपर लाभ देण्यात येणार आहे. यामध्ये बँकिंग यंत्रणा सक्षम रहावी, यासाठी कर्जमाफीसाठी गठीत केलेल्या समितीच्या शिफारसींतील निकषानुसार कर्जमाफीचा निर्णय घेण्यात येणार आहे. या समितीच्या शिफारशीनुसार शेतकरी कर्जमुक्त होण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजनाही करण्यात येणार आहे.

वर्ष २०४७ पर्यटकांची संख्या ३८ कोटीपर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट !

पर्यटनाला चालना देण्यासाठी वर्ष २०४७ पर्यंत राज्यात येणार्‍या पर्यटकांची संख्या ३८ कोटीपर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट शासनाने ठेवले आहे. सद्यस्थितीत राज्यातील वार्षिक पर्यटकांची संख्या १६ कोटी इतकी आहे. यासाठी राज्यातील ५० पर्यटनस्थळांच्या ठिकाणी पायाभूत सुविधा अत्याधुनिक करण्यासाठी ‘प्रादेशिक पर्यटन विकास योजने’तून प्राधान्याने निधी दिला जाणार आहे. मुंबई, सिंगापूर आणि दुबई या ठिकाणी पर्यटन गुंतवणूक कक्ष चालू करण्यात येणार आहे. ‘जागतिक पर्यटन स्थळे’ विकसित करण्यात येणार आहेत.

अर्थसंकल्पीय वृत्तांत…

अर्थसंकल्पातील निधीची प्रावधाने !

मेट्रो विशेष

  • मुंबई विमानतळ आणि नवी मुंबई विमानतळ यांना जोडणारा ‘मुंबई मेट्रो मार्ग ८’ हा २२ सहस्र ८६२ कोटी रुपये मूल्याचा प्रकल्प हाती घेण्यात येणार आहे.
  • वडाळा ते गेट वे ऑफ इंडिया मुंबई ‘मेट्रो मार्गिका ११’ हा २३ सहस्र ४८७ कोटी रुपये किमतीचा पूर्णत: भूमीगत प्रकल्प हाती घेण्यात आला आहे.
  • तळोजा ते खांदेश्वर ‘नवी मुंबई मेट्रो मार्ग २’ हा ५ सहस्र ५७५ कोटी रुपये किमतीचा प्रकल्पही आयोजित आहे.

सागरी सेतू विशेष

  • ‘स्वातंत्र्यवीर सावरकर वांद्रे-वर्साेवा सागरी सेतू’ या १८ सहस्र १२१ कोटी रुपये मूल्याच्या प्रकल्पाच्या चारही टप्प्यांचे काम मे २०२८ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन
  • वर्साेवा-दहिसर-भाईंदर हा २२ सहस्र १६६ कोटी रुपये मूल्याचा ६० कि.मी. लांबीचा किनारी मार्ग डिसेंबर २०२८ पर्यंत पूर्ण होणार
  • मुंबई-वाढवण द्रुतगती जोडणी करता उत्तन ते विरार या अनुमाने ५८ सहस्र ७५४ कोटी रुपये मूल्याच्या सागरी सेतूचे काम हाती घेतले आहे.

रस्ते विशेष

  • ठाणे ते बोरीवली या १८ सहस्र ८३८ कोटी रुपये मूल्याच्या भुयारी मार्गाचे काम प्रगतीपथावर असून जून २०२८ पर्यंत काम पूर्ण करण्याचे नियोजन
  • खारघर ते तुर्भे या अनुमाने ६ कि.मी. लांबीच्या २ सहस्र १०० कोटी रुपये मूल्याच्या भुयारी मार्गाचे काम सप्टेंबर २०२८ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन

मराठी भाषांतरासाठी अकादमी ! 

  • मराठी भाषेतील साहित्य आणि ग्रंथ अन्य भाषांमध्ये, तसेच अन्य भाषांमधील दर्जेदार साहित्य मराठी भाषेमध्ये अनुवादित करण्यासाठी ‘यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र अनुवाद अकादमी’ स्थापन करण्याचे प्रस्तावित आहे.

शेतीविषयक

  • राज्याच्या कृषीक्षेत्राचे स्थूल देशांतर्गत उत्पादन ५५ अब्ज डॉलर्स वरून ५०० अब्ज डॉलर्स करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
  • कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धीमत्तेच्या उपयोगासाठी ‘महाविस्तार एआय’ हा प्लॅटफॉर्म सिद्ध करण्यात आला आहे. यावरून ३० लाखांहून अधिक शेतकर्‍यांना हवामानाचे अनुमान आणि पिकांविषयी सल्ला मिळत आहे.
  • सकस आणि पोषणयुक्त शेतीसाठी येत्या २ वर्षांत राज्यात ५ लाख हेक्टर भूमीवर नैसर्गिक शेती करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

सकारात्मक अर्थसंकल्प ! – उदय सामंत, उद्योगमंत्री

शेतकरी आणि उद्योजक यांच्यासाठी हा अर्थसंकल्प सकारात्मक आहे. या अर्थसंकल्पातून नक्कीच महाराष्ट्र जागतिक पातळीवरील आर्थिक व्यवस्थेशी सामना करू शकतो.

सर्वसमावेशक अर्थसंकल्प ! – चंद्रकांत पाटील, उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री

अर्थसंकल्पात सामान्य जनता, शेतकरी आणि शिक्षण यांवर विशेष भर देण्यात आला असून हा विकासाला गती देणारा सर्वसमावेशक अर्थसंकल्प आहे.

अजितदादांच्या महत्त्वाकांक्षी आणि दूरदृष्टीचा दृढ संकल्प ! – सुनील तटकरे, प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

अजित पवार यांना अभिप्रेत असणारा विकसित महाराष्ट्राचा पाया रचणारा यंदाचा अर्थसंकल्प आहे. सर्वच क्षेत्रांत विकासाची झेप घेण्यासाठी यंदाचा अर्थसंकल्प महत्त्वाचा टप्पा ठरेल.

कर्ज काढून फटाके वाजवणारा अर्थसंकल्प ! – उद्धव ठाकरे, ठाकरे गट 

हा अर्थसंकल्प केवळ अल्पकालीन लाभ आणि कंत्राटदारांचे हित यांवर आधारित आहे. राज्यावर कर्जाचा डोंगर वाढत असतांना ही प्रावधाने कशी पूर्ण होणार ? कर्ज काढून फटाके फोडल्यासारखे हा अर्थसंकल्प आहे.

हा अर्थसंकल्प राज्याचा नसून कंत्राटदारांचा ! – विजय वडेट्टीवार, काँग्रेस 

राज्य भिकारी होण्याच्या मार्गावर असून दुर्गम जिल्ह्यांसाठी अर्थसंकल्पामध्ये काहीच नाही. सुशिक्षित बेरोजगारांसाठी एकही नवीन उद्योग किंवा रोजगाराची ठोस योजना यात नाही.

शेती रसातळाला गेली असतांना फक्त घोषणांचा पाऊस ! – अंबादास दानवे, ठाकरे गट

राज्याचा आर्थिक पहाणी अहवाल कृषी क्षेत्राच्या दुरवस्थेवर शिक्कामोर्तब करत आहे. शेती रसातळाला गेली असतांना सरकार मात्र फक्त घोषणांचा पाऊस पाडत आहे.

अर्थसंकल्पातील काही नवीन घोषणा !

१. सध्या राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकल महिलांचे सर्वेक्षण चालू आहे. सर्वेक्षण पूर्ण झाल्यावर त्यांच्या कल्याणासाठी सुयोग्य धोरण घोषित केले जाईल.

२. सेवा क्षेत्राचे स्थूल उत्पन्न वर्ष २०४७ पर्यंत ३१२ अब्ज डॉलर्सवरून ३ सहस्र अब्ज डॉलर्सपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

३. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्याचे प्रतीक असलेला सातारा येथील सह्याद्री पर्वतरांगांमधील वासोटा गडावर ‘रोपवे’ प्रकल्प करण्यात येणार.

४. राज्यातील तिसरी चित्रनगरी नागपूर येथील रामटेक तालुक्यातील नवरगाव येथे विकसित केली जाणार.

५. मुंबई महानगर प्रदेशाची १४० अब्ज डॉलर असलेली अर्थव्यवस्था वर्ष २०३० पर्यंत ३०० अब्ज डॉलर्सपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

६. राज्यातील १ सहस्रपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या गावांना काँक्रिटच्या रस्त्यांनी जोडण्यात येईल. त्यासाठी आशियाई बँकेच्या साहाय्याने ४ सहस्र ५०० कोटी रुपये मूल्याचा कार्यक्रम राबवण्यात येणार.

मुंबईतील वाहतूक कोंडीवर जलमार्गाचा उपाय !

मुंबई महानगरातील वाढत्या वाहतूक कोंडीला पर्याय म्हणून जलमार्गाचा विस्तार ३४० किलोमीटरपर्यंत करण्यात येणार आहे. सध्याचा जलमार्ग १२५ किलोमीटर आहे. सध्या जलमार्गाद्वारे एका वर्षात १ कोटी ६० लाख नागरिक प्रवास करतात. वर्ष २०३१ पर्यंत प्रवाशांची संख्या ७ कोटी ३९ लाखापर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यासाठी नवीन ११ जलमार्गांवर २४ टर्मिनल्सची निर्मिती करण्यात येणार आहे. यासाठी ६ सहस्र ६०० कोटी रुपये व्यय अपेक्षित आहे. सध्या २१ जलमार्ग अस्तित्वात आहेत. मुंबईतील ‘रेडिओ क्लब’ येथील नवीन जेट्टी प्रकल्प डिसेंबर २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजित आहे.

अर्थसंकल्पाचे वाचन करण्यापूर्वी सभागृहात छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयजयकार करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी ‘अमर रहे, अमर रहे, अजित पवार अमर रहे’ अशी घोषणा दिली.

प्रगतीशील, शाश्वत, सर्वसमावेशक आणि सुशासन या ४ तत्त्वांवर, तसेच वर्ष २०४७ पर्यंत ५ ट्रिलियन डॉलर म्हणजे अर्थसंकल्पाचे उद्दिष्ट गाठण्यासाठीच्या अनुषंगाने हा अर्थसंकल्प असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी घोषित केले.