(म्हणे) ‘बांगलादेशाऐवजी भारताने स्वतःच्या अल्पसंख्यांकांकडे लक्ष दिले, तर अधिक चांगले होईल !’ – Touhid Hossain

बांगलादेशाच्या अंतरिम सरकारमधील परराष्ट्र सल्लागार तौहीद हुसेन यांचे भारतविरोधी विधान

तौहीद हुसेन

ढाका (बांगलादेश) : आम्ही भारतातील अल्पसंख्यांकांवरील कारवायांवर विधान करत नाही. भारतीय अधिकार्‍यांनीही हीच भूमिका घ्यावी, अशी अपेक्षा आहे. आमच्या नागरिकांवर अत्याचार झाल्यास त्यावर उपाय करण्यासाठी आमच्याकडे यंत्रणा आहेत. भारताने स्वतःच्या अल्पसंख्यांकांकडे लक्ष दिले, तर अधिक चांगले होईल. आम्ही आमचे काम स्वतः करू, असे विधान बांगलादेशाच्या अंतरिम सरकारमधील परराष्ट्र सल्लागार तौहीद हुसेन यांनी केले आहे.

भारतियांची सुरक्षा करण्यास अपयशी ठरल्याचा कोणताही पुरावा नाही !

बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत तौहीद हुसेन यांनी ढाका येथील भारतीय उच्चायोगातील राजनैतिक अधिकार्‍यांच्या कुटुंबियांना परत बोलावण्याच्या भारताच्या निर्णयावर आक्षेप नोंदवला. ते म्हणाले की, अलीकडेच भारताने त्याच्या राजनैतिक अधिकार्‍यांच्या कुटुंबियांना बांगलादेशातून परत बोलावले आहे. आम्ही भारतीय नागरिकांची सुरक्षा सुनिश्चित करण्यात अपयशी ठरलो, असा कोणताही पुरावा नाही. त्यामुळे भारताचा हा निर्णय आम्हाला योग्य वाटत नाही.

(म्हणे) ‘आम्ही असे काय केले की, भारताशी संबंध बिघडले ?’

‘भारत आणि बांगलादेश यांचे संबंध सध्या सर्वांत खालच्या पातळीवर आहेत का ?’, या प्रश्नावर हुसेन म्हणाले, ‘‘मला याविषयी ठाऊक नाही; मात्र बांगलादेश आणि भारत यांचे संबंध दोन्ही देशांसाठी महत्त्वाचे आहेत अन् ते सुधारण्यासाठी दोन्ही बाजूंनी पावले उचलली पाहिजेत. भारताशी संबंध खालच्या पातळीवर नेणारे कोणतेही पाऊल आमच्या बाजूने उचलले गेलेले नाही. देहलीतील माझ्या समकक्षांना (परराष्ट्रमंत्र्यांना) विचारून पाहा की, आमच्याकडून त्यांच्यासाठी कोणते कठोर पाऊल उचलले गेले आहे का ? आम्ही असे काय केले, ज्यामुळे भारताशी संबंध बिघडले ?’’ (याला म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा ! – संपादक)

शेख हसीना यांचा उल्लेख करतांना हुसेन म्हणाले की, त्या भारतात असतांना बांगलादेशाच्या सध्याच्या परिस्थितीशी विसंगत असलेली विधाने टाळतील, अशी आमची अपेक्षा होती; मात्र तसे झाले नाही.

पाकशी चांगले संबंध ठेवायचे आहेत !

इस्लामाबाद आणि ढाका यांच्यातील संबंधांवर बोलतांना तौहीद हुसेन म्हणाले की, पाकिस्तानशी संबंध मागील शासनकाळात, शेख हसीना यांच्या काळात, जाणूनबुजून बिघडवले गेले होते. पाकिस्तानसमवेत आमचे काही प्रश्न आहेत आणि त्यावर चर्चा चालू आहे. त्याचबरोबर त्यांच्याशी सामान्य संबंध प्रस्थापित करण्याचाही आम्ही प्रयत्न करत आहोत. ‘कोणत्याही देशाशी चांगले संबंध ठेवण्याची इच्छा बाळगण्यात चुकीचे काय आहे ?’, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. शेजारी देश म्हणून पाकिस्तानशी सामान्य संबंध ठेवायचे आहेत. इतर देशांप्रमाणेच आम्हालाही सर्व देशांशी चांगले संबंध हवे आहेत, असे त्यांनी सांगितले.

संपादकीय भूमिका

‘चोर तो चोर वर शिरजोर’ या वृत्तीचा बांगलादेश ! भारतात भारतीय मुसलमानांसमवेत बांगलादेशी घुसखोर मुसलमानही सुरक्षित आहेत आणि त्यांना भ्रष्टाचारामुळे भारतात नागरिकत्वाची ओळखपत्रेही मिळत आहेत; मात्र बांगलादेशाचे नागरिक असणार्‍या अल्पसंख्य हिंदूंना बांगलादेशात अत्याचारांना सामोरे जावे लागत आहे आणि हे जग पहात आहे. यावर आवाज उठवणे हा भारताचा अधिकार आहे !