Balochistan China Troops : चीनने बलुचिस्तानमध्ये सैन्य तैनात केल्यास भारतासाठीही आव्हान ! – बलुची नेते मीर यार बलोच

बलुचिस्तानच्या नेत्याने परराष्ट्रमंत्री डॉ. जयशंकर यांना खुले पत्र लिहून व्यक्त केली चिंता

नवी देहली – पाकिस्तानातील बलुचिस्तान प्रांतातील निर्वासित बलुची नेते मीर यार बलोच यांनी भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांना एक खुले पत्र लिहिले आहे.

या पत्रात चीन आणि पाकिस्तान यांच्यात वाढत चाललेल्या जवळीकीवर चिंता व्यक्त केली आहे. ‘बलुचिस्तानमधील स्वातंत्र्यलढ्याला योग्य वेळी बळ न मिळाल्यास चीन येथे सैन्य तैनात करू शकतो’, अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली. बलुचिस्तानमध्ये चिनी सैन्याची उपस्थिती भविष्यात भारत आणि बलुचिस्तान दोघांसाठीही मोठे आव्हान ठरेल, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.

सांस्कृतिक आणि आध्यात्मिक नात्यांवर भर

या पत्रात मीर यार बलोच यांनी भारत आणि बलुचिस्तान यांच्यातील सांस्कृतिक, आध्यात्मिक, धार्मिक आणि व्यापारी संबंधांची चर्चा केली. त्याचबरोबर त्यांनी पाकिस्तानला मूळासकट उखडून टाकण्याची मागणी केली आणि यासाठी बलुचिस्तानमधील प्रत्येक नागरिक भारताच्या पाठीशी असल्याचे नमूद केले. श्री हिंगलाजमाता मंदिरासारख्या पवित्र स्थळांचा उल्लेख करून त्यांनी ही आपली सांधलेली परंपरा असल्याचे स्पष्ट केले.

‘ऑपरेशन सिंदूर’चे कौतुक

मीर यार बलोच यांनी पहलगाम येथील जिहादी आतंकवादी आक्रमणानंतर भारताने केलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’चे कौतुक केले आणि भारत सरकारच्या ठाम अन् धाडसी भूमिकेची प्रशंसा केली. त्यांनी नमूद केले की मागील ६९ वर्षांपासून बलुचिस्तानमधील लोक पाकिस्तानकडून होणार्‍या दडपशाहीला सामोरे जात आहेत आणि आता या समस्येचे मूळापासून निराकरण करून देशाचे सार्वभौमत्व सुरक्षित करणे आवश्यक आहे.