विद्यार्थ्यांच्या यशात शिक्षक आणि पालक यांचे योगदान महत्त्वाचे ! – डॉ. ऋचा औरंगाबादकर

फाटक हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थ्यांचा गुणगौरव

रत्नागिरी – विद्यार्थ्यांनी ध्येयावर लक्ष केंद्रित करून आनंदाने अभ्यास करावा. स्वतःवर विश्वास ठेवा. प्रत्येक जण कोणत्यातरी क्षेत्रात हुशार असतो, ते क्षेत्र प्रत्येकाने ओळखावे, असे प्रतिपादन प्रमुख पाहुण्या आणि फाटक हायस्कूलच्या माजी विद्यार्थिनी डॉ. ऋचा औरंगाबादकर-टेंबे यांनी केले. औचित्य होते फाटक हायस्कूल व श्रीमान वि. स. गांगण कला, वाणिज्य आणि कै. त्रि.प. केळकर विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयातील दहावी, बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभाचे. २४ जूनला सकाळी शाळेच्या सांस्कृतिक सभागृहात कार्यक्रम झाला.

प्रास्ताविकामध्ये मुख्याध्यापक राजन कीर यांनी शाळेच्या कला, क्रीडा आणि शैक्षणिक विभागातील यशाचा आलेख मांडला. यानंतर शाळेला डॉक्टर होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धेतील ‘गोल्ड मेडल’ प्राप्त करणार्‍या, तसेच एस्.एस्.सी. बॅच २०१२ च्या १०० टक्के गुण प्राप्त करून प्रथम क्रमांक प्राप्त माजी विद्यार्थिनी डॉ. ऋचा औरंगाबादकर यांचा सत्कार अधिवक्त्या (सौ.) सुमिता भावे यांनी केला.

दहावीच्या परीक्षेत १०० टक्के गुण प्राप्त करून प्रथम क्रमांक पटकावणार्‍या नवेली सचिन भिंगार्डे आणि प्रणिता प्रणव परांजपे, बारावीतील कला, वाणिज्य, विज्ञान शाखेतील तन्वी अमित कांबळे, प्रज्ज्वल राजेश काजरेकर, गार्गी विकास पावसकर या प्रथम क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांसह द्वितीय, तृतीय क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांसह आणि विविध विषयातील प्रथम क्रमांक, तसेच ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण प्राप्त ३६ गुणवंतांना रोख रक्कम आणि भेटवस्तू देऊन मान्यवरांच्या शुभहस्ते गौरवण्यात आले.