प्रत्येक गावात हवामान केंद्र उभारणार !

मुंबई – गावागावात हवामान केंद्र झाल्यास, निसर्गाच्या लहरीपणामुळे प्रत्यक्ष झालेल्या शेतपिकांच्या हानीचा आकडा आणि विम्याचे निकष यांची तंतोतंत जुळवणी करणे शक्य होईल. यामुळे शेतकर्‍यांना अचूक हानीभरपाई मिळवून देता येईल, यासाठी प्रत्येक गावात हवामान केंद्र उभारण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यासाठी केंद्रशासनाकडे लवकरच प्रस्ताव पाठवण्यात येईल, असे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले.

पालघर जिल्ह्यातील हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेतील अनियमितता, शेतकर्‍यांना न मिळालेली हानीभरपाई आणि प्रलंबित तक्रारींविषयी मंत्रालयात २३ जून या दिवशी झालेल्या बैठकीत मंत्री भरणे यांनी ही माहिती दिली.

डहाणू आणि बोईसर येथील शेतकर्‍यांनी विम्याचा हप्ता भरूनही त्यांची नोंदणी पूर्ण झाली नाही. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे निर्देश कृषीमंत्र्यांनी पालघरच्या जिल्हाधिकार्‍यांना या वेळी दिले.