बांगलादेशाच्या माध्यमातून भारतात आतंकवादी कारवाया चालू होतील ! – Sheikh Hasina’s Son

  • बांगलादेशाच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांचे पुत्र साजीब वाझेद यांचा दावा !

  • लाल किल्ल्याजवळील आतंकवादी आक्रमणामागे बांगलादेशातील आतंकवादी संघटना असल्याचाही दावा

बांगलादेशाच्या माजी पंतप्रधान शेख हसीना व त्यांचे पुत्र साजीब वाझेद

नवी देहली – बांगलादेशात पूर्वी शेख हसीना यांच्या आवामी लीग सरकारने भारताच्या पूर्वेकडच्या सीमांना लागून असलेल्या बांगलादेशाच्या सीमा आतंकवादमुक्त ठेवल्या होत्या. त्याआधी बांगलादेशाचा वापर भारतात आतंकवादी कारवाया करण्यासाठीचा तळ म्हणून केला जात होता. आता पुन्हा तीच परिस्थिती निर्माण होईल, अशी भीती बांगलादेशाच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांचे पुत्र साजीद वाझेद यांनी व्यक्त केली. ‘देहलीतील लाल किल्ल्याजवळ नुकत्याच झालेल्या बाँबस्फोटामागे बांगलादेशामधील आतंकवादी संघटनेचा हात असल्याची माहिती मला संरक्षण विभागातील विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे’, असा दावाही साजीब वाझेद यांनी केला आहे.

शेख हसीना यांचे भारताने प्रत्यार्पण करू नये !

बांगलादेशामधील अंतरिम सरकारने भारताकडे शेख हसीना यांचे प्रत्यार्पण करण्याची मागणी केली आहे. भारताने त्यावर सकारात्मक प्रतिसाद दिलेला नाही. यासंदर्भात साजीब वाझेद म्हणाले की, कोणत्याही वैध प्रत्यार्पणासाठी नियमाप्रमाणे सर्व प्रक्रिया पार पाडली जायला हवी; पण बांगलादेशामध्ये नियमांवर आधारित व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. माझ्या आईला तिथल्या न्यायालयात खटला चालवण्यासाठी स्वतःचा अधिवक्ता नेमण्याचीही अनुमती नाकारली गेली. त्यामुळे भारताने बांगलादेश सरकारच्या विनंतीवर काहीही करणे मला अपेक्षित नाही.

बांगलादेशाची फाळणी होईल !

भारताने बांगलादेशामधील परिस्थिती निवळण्यासाठी अधिक कार्यक्षमपणे काम करावे, अशी अपेक्षा साजीब वाझेद यांनी व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, बांगलादेशात लोकशाही प्रक्रिया पुन्हा प्रस्थापित व्हावी, यासाठी भारताने आंतरराष्ट्रीय समुदायाला सहभागी करून घेण्यात अधिक कार्यक्षम भूमिका बजावायला हवी. आवामी लीग आणि जातीय पार्टी या बांगलादेशातील २ मोठ्या पक्षांना निवडणुकीत सहभाग घेण्यापासून रोखल्यामुळे बांगलादेशामधील निम्म्या लोकसंख्येचा निवडणुकीचा अधिकारच हिरावून घेतला गेला आहे. हा देश लवकरच विभागला जाणार आहे, अशी भीती या वेळी साजीब वाझेद यांनी व्यक्त केली.

संपादकीय भूमिका

भारत बांगलादेशातील स्थितीच्या संदर्भात गेल्या दीड वर्षांपासून केवळ बघ्याची भूमिका घेत आहे. याचा परिणाम भारताला भोगावे लागणार आहेत, हेच वाझेद सांगत आहेत. आतातरी भारत कृतीशील होऊन काही करील का ?