Pakistan Expired Relief Material : पाकिस्तानकडून चक्रीवादळाचा फटका बसलेल्या श्रीलंकेला कालबाह्य साहित्याचा पुरवठा !

पाकिस्तानकडून आलेले कालबाह्य साहित्य

कोलंबो (श्रीलंका) – श्रीलंकेतील कोलंबोमध्ये दिटवा चक्रीवादळामुळे पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली. याचा फटका बसलेल्या जनतेला पाकिस्तानने साहाय्य करण्यासाठी जे साहित्य पाठवले, ते कालबाह्य असल्याचे उघड झाले. पाकिस्तानच्या उच्चायुक्तालयाने सामाजिक माध्यमावर पोस्ट केली होती की, ते नेहमीच श्रीलंकेच्या पाठीशी उभे आहेत आणि साहाय्याचे साहित्य पाठवत आहेत. तथापि पाकिस्तान उच्चायुक्तालयाने आता ही पोस्ट हटवली आहे.

तथापि अनेक माध्यमांवरील अनेक वापरकर्त्यांनी लगेचच पाकच्या या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ‘पाकिस्तानने श्रीलंकेला पाठवलेले साहाय्य एक वर्षापूर्वीच कालबाह्य झाले होते. यामुळे पाकिस्तानच्या हेतूविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे’, असा त्यांनी आरोप केला. या खुलाशानंतर पाकिस्तानवर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. पूरसदृश आपत्तीच्या वेळी कालबाह्य साहित्य पाठवणे, हे पाकिस्तानचे अविश्वसनीय आणि लज्जास्पद पाऊल आहे, अशी टीका काहींनी केली आहे.

दुसरीकडे भारताने मात्र ‘ऑपरेशन सागर बंधू’ अंतर्गत श्रीलंकेला आवश्यक ते सर्व साहित्य पाठवून मैत्रीचे कर्तव्य बजावले.

संपादकीय भूमिका

पाकिस्तान स्वतःच भिकेला लागला आहे, तरी तो जगासमोर केवळ मोठेपणा मिरवण्यासाठी अन्य देशांना साहाय्य करत असल्याचा आव आणतो, हेच यावरून दिसून येते !