आज कोल्हापूर येथे मालेगाव स्फोटातील निर्दाेष सुटलेल्या हिंदुत्वनिष्ठांच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे, त्या निमित्ताने…
‘भगवा आतंकवाद असे बोलायला नको होते. हे माझे विचार नसून माझ्या पक्षाची भूमिका मी मांडली होती’, असे काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेते तथा माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे म्हणाले खरे; पण त्यामुळे हिंदुत्वनिष्ठांवर लागलेला हा डाग पुसला जाणार नाही. हा अपप्रचार दूर करण्यासाठी हिंदुत्वनिष्ठांना धाडसाने पुरुषार्थाची पराकाष्ठा करावी लागणार आहे.

१. ‘भगव्या आतंकवादा’चे षड्यंत्र आणि त्यातील पोकळपणा !
काँग्रेससारख्या ‘निधर्मी (सेक्युलर)’ विचारांच्या शासनकर्त्यांनी साम्यवादी, जिहादी शक्ती यांच्या समवेत एकत्र येऊन पद्धतशीरपणे ‘देशात ‘भगवा आतंकवाद’ आहे, तो वाढत चालला आहे आणि तो पसरवणार्या काही हिंदुत्वनिष्ठ संघटना आहेत’, असा अपप्रचार करण्यासाठी मालेगाव २००८ स्फोट, समझोता बाँबस्फोट, मडगाव स्फोट २००९, दाभोलकर हत्या, पानसरे हत्या अशा अनेक प्रकरणांमध्ये जाणीवपूर्वक निष्पाप हिंदुत्वनिष्ठांना गोवले. ही प्रकरणे जलद गती न्यायालयात न चालवता हेतूपुरस्सर वेळकाढूपणा केला आणि अनेक वर्षांनी जसे या प्रकरणांचे निकाल यायला लागले, त्यात हिंदुत्वनिष्ठ निर्दोष बाहेर पडून ‘हा अपप्रचार किती पोकळ होता’, हे आता स्पष्ट होत आहे.

२. भगव्या आतंकवादाच्या अपप्रचाराचे दुष्परिणाम
अ. कित्येक हिंदुत्वनिष्ठ आणि त्यांचे कुटुंबीय यांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले.
आ. दिलीप पाटीदारसारखे काही हिंदुत्वनिष्ठ अजूनही बेपत्ता आहेत, ते जिवंत आहेत कि नाही ? हेसुद्धा त्यांच्या नातेवाइकांना सांगता येणार नाही.
इ. अनेक हिंदुत्वनिष्ठांची ऐन उमेदीतील अनेक वर्षे वाया गेली, ज्याची हानी कधीच भरून काढता येणार नाही. या काळात काहींच्या नातेवाइकांचे निधन झाले, ज्यांची भेट आता घेणे कधीच शक्य होणार नाही.
ई. अनेक हिंदुत्वनिष्ठ संघटनांचीही यामुळे अपरिमित हानी झाली. असंख्य कार्यकर्त्यांच्या विनाकारण चौकशा झाल्याने त्यांना मनस्ताप झाला. एवढेच नाही, तर समाजात विनाकारण संशयित नजरांचा सामना करावा लागला.
उ. आपल्याच देशात हिंदुत्वनिष्ठ संघटनांना एखाद्या आतंकवादी संघटनेप्रमाणे वागणूक देण्यात आली. त्यामुळे नव्याने या संघटनांमध्ये जाण्याचा विचार करतांना मधल्या काही वर्षांत अनेक वेळा विचार करावा लागला.
ऊ. जागतिक स्तरावर हिंदु समाज, हिंदुत्वनिष्ठ संघटना यांची अपकीर्ती झाली.
अशी भरून न निघण्यासारखी प्रचंड हानी या अपप्रचारामुळे झालेली आहे. त्यामुळे केवळ ‘मी तेव्हा असे बोलायला नको होते’, या पोकळ शब्दांनी तर ती कधीच भरून निघणार नाही. उलट आता हे जे उपरती झाल्याचे सोंग घेत आहेत, ते म्हणजे हिंदुत्वनिष्ठांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखेच आहे.
३. हिंदुत्वनिष्ठांना येणार्या काळात हे करावेच लागेल !
अ. आपण एक वेळ वैयक्तिक अपमान, हानी सहन करू; पण पवित्रतम अशा हिंदु धर्माची केलेली अपकीर्ती कदापि खपवून घेणार नाही. त्यामुळे भगव्या आतंकवादाचा अपप्रचार करणार्यांना कदापिही क्षमा नाही. त्यांना हिंदु समाजानेच वैध मार्गाने अद्दल घडवली पाहिजे.
आ. यात ज्यांना भोगावे लागले, अशा हिंदुत्वनिष्ठांनी हा अपप्रचार करणार्यांच्या पापाचा पाढाच जगासमोर उघड करायला पाहिजे. यात हिंदुत्वनिष्ठांनी केवळ आपण कसे निर्दोष होतो आणि आपल्यावर अत्याचार कसे झाले, एवढेच सांगून चालणार नाही, तर हे षड्यंत्र आखणार्यांचे अन् त्यांना आतून साहाय्य करणार्यांचे बुरखे फाडून त्यांना कठोर शासन होईपर्यंत हा लढा द्यावा लागणार आहे.
इ. सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, पी. चिदंबरम् असे काँग्रेसचे अनेक नेते ज्यांनी जाणीवपूर्वक भगव्या आतंकवादाचा बागुलबुवा उभा केला आहे, त्यांनी आता कितीही सारवासारव केली, तरी त्यांनी जे धर्मद्रोहाचे कृत्य केले आहे, त्यांच्यावर कठोर शासन होईपर्यंत अथवा किमान त्यांची पापे सर्वत्र बाहेर येईपर्यंत अजिबात शांत बसू नका. अन्यथा भविष्यात साम्यवादी, पुरोगामी कंपू यांनाच ‘हिरो’ बनवून पुढच्या पिढीच्या मनमस्तिष्काशी खेळण्याचा विषारी प्रयोग करील, यात तीळमात्र शंका नाही.
ही वाट जरी जोखमीची असली, तरी त्याविना तरणोपाय नाही.
– श्री. प्रशांत हेमंत जुवेकर, जळगाव.
क्रिकेटचा उदो उदो नको !
बलात्कार प्रकरणी पोलीस आणि प्रशासन यांना निर्देश देणारे झारखंड उच्च न्यायालयाचे निकालपत्र !
मनुष्याचे शरीर, चित्त, मन आणि बुद्धी यांच्यावर प्रारब्धाचा असलेला प्रभाव अन् त्यांचा ग्रहांशी असलेला संबंध !
ओस पडत चाललेल्या चर्चचा पंचनामा ?
स्त्रीत्वाचा उत्सव !
गुरुकृपायोगानुसार साधनेच्या अंतर्गत ‘सत्संग’ आणि कला !