Air Chief Marshal AP Singh : ‘ऑपरेशन सिंदूर’वरून जगाने भारताकडून शिकावे !

जगात चालू असलेली २ युद्धे निर्णायक स्थितीला जात नसल्यावरून भारतीय वायूूदलाचे प्रमुख एअरचीफ मार्शल ए.पी. सिंह यांचे विधान

एअरचीफ मार्शल ए.पी. सिंह

नवी देहली – जगात काय घडत आहे, ते आपण पाहतो; दोन चालू युद्धे (रशिया-युक्रेन आणि इस्रायल-हमास) संपण्याची चिन्हे नाहीत; परंतु आपण ‘ऑपरेशन सिंदूर’च्या वेळी आपला लढा इतका वाढवला की, शत्रूने युद्धबंदीची मागणी केली. मला वाटते की, जगाने भारताकडून हे शिकण्याची आवश्यकता आहे, असे विधान भारतीय वायूूदलाचे प्रमुख एअरचीफ मार्शल ए.पी. सिंह यांनी केले.

एअरचीफ मार्शल ए.पी. सिंह यांनी दिलेली माहिती

१. पहलगाम येथील आतंकवादी आक्रमणानंतर आम्ही ठरवले की, पाकिस्तानला त्याच्या कृत्याची किंमत मोजावी लागेल. सैन्याला पूर्ण स्वातंत्र्य देण्यात आले आहे. आम्ही अचूकतेने आक्रमण केले. पाकमध्ये ३०० कि.मी. घुसून आक्रमण केले. नंतर पाकने स्वतःच युद्धबंदीला मान्यता दिली.

२. पाकच्या दाव्यांवर मी का बोलावे ? जर त्यांना वाटत असेल की, त्यांनी आमची १५ विमाने पाडली, तर त्यांना त्याविषयी विचार करू द्या. मी त्याविषयी का बोलू ? ‘ऑपरेशन सिंदूर’च्या वेळी भारताची लढाऊ विमाने पाडल्याचे पाकिस्तानचे दावे परीकथेसारखे आहेत. जर पाककडे पुरावे असील, तर त्याने ते द्यावेत.

३. पाकिस्तानच्या हानीविषयी बोलायचे झाले, तर आम्ही मोठ्या संख्येने त्यांच्या सैन्यतळांवर आक्रमण केले. यात किमान ४ ठिकाणी रडार, २ ठिकाणचे ‘कमांड अँड कंट्रोल सेंटर’ आणि २ ठिकाणच्या धावपट्टी यांची हानी झाली. ३ हँगर (विमाने ठेवण्याची जागा) नष्ट झाले आणि किमान ५ लढाऊ विमाने नष्ट झाली. यात अमेरिकी बनावटीची  एफ्-१६ आणि जे-१७ यांचा समावेश आहे.

नवीन आतंकवादी तळही नष्ट करू !

पाकिस्तानातील खैबर पख्तूनख्वा येथे नवीन आतंकवादी तळ बांधले जात असल्याच्या वृत्तांवर वायूदलप्रमुख म्हणाले की, अर्थातच हे घडणे निश्चितच होते. आम्हाला असेही अहवाल मिळाले आहेत की, ते मोठ्या इमारतींऐवजी लहान इमारती बांधत आहेत; परंतु तरीही आम्ही आतंकवादी आणि त्यांचे तळ नष्ट करू शकतो.