वाहनचालकांच्या जिवाशी खेळ खपवून घेणार नाही ! – महसूल राज्यमंत्री योगेश कदम

भोस्ते घाटातील महामार्गाच्या धोकादायक भेगांची प्रत्यक्ष पहाणी

रत्नागिरी – मुंबई-गोवा महामार्गावरील खेडजवळील अत्यंत संवेदनशील अशा भोस्ते घाटात रस्त्याला पडलेल्या धोकादायक भेगांची १७ जुलै या दिवशी महसूल, गृह (शहरे), ग्रामविकास आणि पंचायत राज, अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री योगेश कदम यांनी प्रत्यक्ष पहाणी केली. भर पावसाळ्यात रस्ता खचून मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता लक्षात घेऊन महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी आणि संबंधित ठेकेदाराला तातडीने घटनास्थळी पाचारण करत कामाचा सविस्तर आढावा त्यांनी घेतला. या पहाणी दौर्‍याप्रसंगी स्थानिक लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी, महामार्ग पोलीस दल आणि स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.

पहाणी दरम्यान ठेकेदाराने या गंभीर भेगांवर केवळ तात्पुरती मलमपट्टी केल्याचे निदर्शनास आले. या निष्काळजीपणावर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त करत ठेकेदाराला आणि प्रशासकीय अधिकार्‍यांना राज्यमंत्री कदम यांनी खडे बोल सुनावले. ‘तात्पुरती डागडुजी बंद करा आणि या ठिकाणी तातडीने कायमस्वरूपी आणि अत्यंत दर्जेदार काम पूर्ण करा.’’ असे स्पष्ट निर्देश या वेळी त्यांनी दिले.

राज्यमंत्री कदम म्हणाले की, भोस्ते घाटातील या भेगांची भूगर्भशास्त्रज्ञ आणि तांत्रिक तज्ञांकडून सखोल तपासणी करून घ्यावी आणि त्यानुसारच कायमस्वरूपी दुरुस्तीचे काम हाती घ्यावे. काम चालू असतांना या मार्गावरील वाहतूक सुरक्षित आणि सुरळीत रहाण्यासाठी दिशादर्शक फलक, सुरक्षारक्षक, बॅरिकेड्स लावणे यांसारख्या आवश्यक त्या सर्व उपाययोजना राबवण्यात याव्यात. महामार्गासारख्या महत्त्वाच्या रस्त्यावर निकृष्ट दर्जाचे काम करणार्‍यांवर आणि हलगर्जीपणा करणार्‍या संबंधित यंत्रणेवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.

संपादकीय भूमिका

केवळ चेतावणी देऊन नव्हे, तर निकृष्ट काम करणारे ठेकेदार आणि त्यांच्यावर देखरेख करणारे प्रशासकीय अधिकारी यांच्यावर कठोर कारवाई केली, तरच अशा समस्या थोड्या तरी सुटतील !