India Slams Turkiye : संयुक्त राष्ट्रांच्या नियमांनुसार सायप्रस वाद सोडवा !

  • संयुक्त राष्ट्रांत काश्मीरचे सूत्र उपस्थित करणार्‍या तुर्कीयेला भारताचे सडेतोड प्रत्युत्तर

  • तुर्कीयेने उत्तर सायप्रसवर मिळवले आहे अवैध नियंत्रण !

तुर्कीयेचे राष्ट्राध्यक्ष एर्दोगान व भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल

नवी देहली – परराष्ट्र मंत्री एस्. जयशंकर यांनी अलीकडेच सायप्रसच्या परराष्ट्रमंत्र्यांशी चर्चा केली आहे. या बैठकीत त्यांनी संयुक्त राष्ट्रांच्या नियमांनुसार सायप्रस वाद सोडवण्यावर चर्चा केली, अशी माहिती भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी साप्ताहिक पत्रकार परिषदेत दिली. वर्ष १९७४ मध्ये तुर्कीयेने उत्तर सायप्रसवर अवैध नियंत्रण मिळवले आहे. तेव्हापासून वाद आहे. जयशंकर यांच्या भेटीच्या २ दिवस आधी तुर्कीयेचे राष्ट्राध्यक्ष एर्दोगान यांनी संयुक्त राष्ट्रांमध्ये जम्मू-काश्मीरचे सूत्र  उपस्थित केले होते. ‘काश्मीर सूत्रावर आमची भूमिका गेल्या १० वर्षांपासून पूर्णपणे स्पष्ट आहे’, असे जयस्वाल यांनी स्पष्ट केले.

‘नाटो’ प्रमुखांचे विधान भारताने फेटाळले !

‘पंतप्रधान मोदी यांनी युक्रेन युद्धाच्या सूत्रावर राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्याशी चर्चा केली होती’, हे ‘नाटो’  (‘नाटो’ म्हणजे ‘नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन’ नावाची जगातील २९ देशांचा सहभाग असलेली एक सैनिकी संघटना) संघटनेचे प्रमुख मार्क रुट्टे यांचे विधान जयस्वाल यांनी या वेळी पूर्णपणे फेटाळून लावले. ते म्हणाले की, अशी कोणतीही चर्चा झाली नाही. ‘नाटो’ला त्यांच्या निवेदनात सावधगिरी बाळगली पाहिजे.