तीर्थक्षेत्र पैठण येथे ८ नाल्यांचे दुर्गंधीयुक्त आणि रसायनमिश्रित पाणी गोदावरी नदीपात्रात !

  • प्रशासनाचा अक्षम्य हलगर्जीपणा !

  • भ्रष्ट प्रदूषण नियंत्रण मंडळाची डोळेझाक; वारंवार तक्रारी करूनही ठोस कारवाई शून्य !

नदीचे छायाचित्र

पैठण (छत्रपती संभाजीनगर) – येथील गोदावरी नदीत अधिक मासाच्या (धार्मिक पर्वाच्या) निमित्ताने पवित्र स्नानासाठी प्रतिदिन ५ ते ६ सहस्र भाविक येत आहेत; मात्र पैठण शहरामधील ८ नाल्यांचे अत्यंत दुर्गंधीयुक्त आणि केमिकलयुक्त (रसायनमिश्रित) पाणी थेट नदीपात्रात सोडण्यात येत असल्याने भाविकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. हिंदूंच्या धार्मिक भावना आणि श्रद्धेशी खेळणार्‍या या गंभीर प्रकारामुळे भाविकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. (आता पुरोगामी कुठे जातात ? – संपादक)

पवित्र घाटांवर घाणीचे साम्राज्य; जायकवाडी धरणाचे पाणीही धोक्यात

अधिक मासामध्ये गोदावरी नदीत स्नान करण्याला हिंदु धर्मात विशेष धार्मिक महत्त्व आहे. यामुळे प्रतिदिन सहस्रो भाविक संत एकनाथ महाराज मंदिराच्या पाठीमागे, नागघाट आणि इतर घाट यांवर स्नानासाठी येत आहेत. शहराच्या क्षेत्राबाहेरील नदीपात्रात सोडले जाणारे हे प्रदूषण थेट जायकवाडी धरणाच्या पाण्यात मिसळत असल्याने परिस्थिती अत्यंत गंभीर बनली आहे.

प्रदूषण मंडळाची निष्क्रीयता

नदीतील वाढत्या प्रदूषणामुळे पवित्र पाण्याचे पावित्र्य तर भंग पावले आहेच, शिवाय त्याचा स्थानिक मासेमारी व्यवसायावरही विपरीत परिणाम होत आहे. गोदावरीत दूषित पाणी मिसळत असल्याच्या तक्रारी वारंवार होऊनही महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून कोणतीही प्रभावी कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे.

राजकीय आणि सामाजिक स्तरावरून उमटलेल्या प्रतिक्रिया !

१. ‘गोदावरी ही पैठणच्या धार्मिक आणि सांस्कृतिक अस्मितेचे प्रतीक मानली जाते. अधिक मासाच्या पार्श्वभूमीवर लाखो भाविकांच्या श्रद्धेशी निगडित असलेल्या या नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी प्रशासन, उद्योग आणि नागरिक यांच्याकडून संयुक्तपणे पुढाकार घेतला जाईल. – पल्लवी अंभोरे, मुख्याधिकारी.

२. ‘अधिक मासासाठी गोदावरी स्नानाला मोठी गर्दी असते. नदीपात्रात रासायनिक दूषित पाणी जाणार नाही, यासाठी विशेष उपाययोजना करण्यात येतील. त्याविषयी नगरपालिका प्रशासनाला त्वरित सूचना देण्यात येणार आहेत.’ – विद्या कावसानकर, नगराध्यक्षा.

३. ‘सहस्रो भाविक गोदावरीत पवित्र स्नानासाठी येत असतांना नदीत रसायनयुक्त पाणी सोडणे अत्यंत गंभीर आहे. संबंधित उद्योगांवर कठोर निर्बंध घालून नदीचे प्रदूषण तातडीने थांबवावे.’ – जितु परदेशी, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस.

४. ‘गोदावरीचे पर्यावरणीय संतुलन राखण्यासाठी दूषित पाणी नदीत सोडणे तात्काळ थांबवले पाहिजे.’ – डॉ. पंडित किल्लारीकर

संपादकीय भूमिका

हिंदुत्वनिष्ठ पक्षांचे सरकार असतांना हिंदूंच्या तीर्थक्षेत्री नद्यांतील प्रदूषणावर कारवाई करणे अपेक्षित !