पोलीस कर्मचारी आणि मुख्य आरोपी यांचा भ्रमणभाषवर संपर्क !

पुणे येथील विषारी दारू प्रकरण

प्रतिकात्मक चित्र

पुणे – पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील विषारी दारू मृत्यूकांडातील मुख्य आरोपी राधेश्याम प्रजापती यांच्याशी निलंबित केलेल्या ४ पोलीस कर्मचार्‍यांनी १५० वेळा भ्रमणभाषवरून संपर्क केल्याचे अन्वेषणातून समोर आले. (अशा पोलिसांना बडतर्फ करा ! – संपादक) त्यामुळे प्रजापतीच्या दारू व्यवसायास पोलिसांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.प्रजापती यांना अटक केल्यानंतर त्यांच्या भ्रमणभाषसह इतर तांत्रिक पुराव्यांची पडताळणी चालू आहे. विषारी दारू प्राशन करून मृत्यू पावलेल्यांची संख्या २२ वर पोचली आहे.

उरुळीकांचन पोलीस ठाण्यातील अजित काळे, सुमित वाघ, यवत पोलीस ठाण्यातील रामदास जगताप आणि सुभाष डोईफोडे अशी निलंबित पोलीस कर्मचार्‍यांची नावे आहेत. या प्रकरणाचे अन्वेषण सीआयडीकडे (गुन्हे अन्वेषण विभाग) वर्ग करण्यात आले आहे. आतापर्यंत या प्रकरणात ८ आरोपींना अटक केली.