Sonia Gandhi : मोदी आणि नेतान्याहू यांच्या मैत्रीवरून परराष्ट्र धोरण न ठरवता पॅलेस्टाईनचा प्रश्न सोडवण्यासाठी भारताने पुढाकार घ्यावा !

काँग्रेसच्या संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची मागणी

सोनिया गांधी

नवी देहली – इस्रायल-पॅलेस्टाईन संघर्षावर भारताची भूमिका अत्यंत निराशाजनक आहे. सरकारचे बधिर करणारे मौन, हे मानवता आणि नैतिकता यांचा विश्वासघात आहे. हे भारताच्या दीर्घकालीन परराष्ट्र धोरणापासून दूर जाण्याचे संकेतही आहेत. भारताची भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्यातील वैयक्तिक मैत्रीने प्रभावित झालेली दिसते. परराष्ट्र धोरण वैयक्तिक संबंधांवरून ठरवले जाऊ नये. पॅलेस्टाईन प्रश्न सोडवण्यासाठी भारताने पुढाकार घ्यावा, अशी मागणी काँग्रेसच्या संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केंद्र सरकारवर टीका करत केली.

सोनिया गांधी पुढे म्हणाल्या की, फ्रान्स, ब्रिटन, कॅनडा, पोर्तुगाल, ऑस्ट्रेलियासह जगातील १९३ पैकी १५० हून अधिक देश पॅलेस्टाईनला ‘स्वतंत्र राज्य’ म्हणून मान्यता देत आहेत. हे पाऊल म्हणजे इतके दिवस त्रास सहन करणार्‍या पॅलेस्टिनी लोकांच्या स्वप्नांच्या दृष्टीने ऐतिहासिक प्रारंभ आहे. जग पॅलेस्टाईनला पाठिंबा देत असतांना भारताने अलीकडेच इस्रायलसमवेत गुंतवणूक करार केला आणि त्यांच्या उजव्या विचारसरणीच्या मंत्र्यांचे स्वागत केले. यावर जगभरात टीका होत आहे. पॅलेस्टाईनचे सूत्र भारतासाठी केवळ परराष्ट्र धोरणाचे सूत्र नाही, तर एक नैतिक आणि सभ्य उत्तरदायित्वही आहे.

संपादकीय भूमिका

सोनिया गांधी यांनी कधी ‘काश्मीरमधील विस्थापित हिंदूंची समस्या सोडवण्यासाठी सरकारने पुढाकार घ्यावा’, असे म्हटले नाही; मात्र पॅलेस्टाईनमधील आतंकवादी ‘हमास’ला समर्थन देणार्‍या मुसलमानांची त्यांना फारच काळजी वाटते, हे लक्षात घ्या !