अर्बन नक्षलवादाच्या समस्येचा खरा जनक काँग्रेसच ! – माधव भांडारी, भाजपचे ज्येष्ठ नेते आणि प्रवक्ते

पुणे येथे ‘वाढता अर्बन नक्षलवाद आणि जनसुरक्षा कायदा’ या विषयावर आयोजित विशेष परिसंवादासाठी १ सहस्रहून अधिक राष्ट्रप्रेमींची उपस्थिती

(डावीकडून) व्यासपीठावर उपस्थित श्री. अभिजीत जोग, अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, श्री. माधव भांडारी, श्री. प्रसाद काथे, श्री. सुनील घनवट आणि श्री. विक्रम भावे

पुणे, २० ऑगस्ट (वार्ता.) – वर्ष १९४२ मध्ये स्वातंत्र्यलढा यशस्वी होऊ नये; म्हणून साम्यवाद्यांनी इंग्रजांसोबत हातमिळवणी केली होती, याची नोंद इतिहासात आहे. पुढे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अशा इंग्रजांच्या हस्तकांना सन्मान देण्याचे काम तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंनी केले. बंगालमधील नक्षलवाद असो वा पंजाबमधील खलिस्तानी समस्या, काँग्रेसने कधीच त्यावर तोडगा काढण्याचा प्रामाणिक प्रयत्न केले नाहीत. आज देशासमोर उभ्या ठाकलेल्या अर्बन नक्षलवादाच्या समस्येचा खरा जनक  काँग्रेसच आहे, असे परखड मत भाजपचे ज्येष्ठ नेते आणि प्रवक्ते श्री. माधव भांडारी यांनी केले. पुणे येथील टिळक स्मारक मंदिर येथे १९ ऑगस्ट या दिवशी ‘राष्ट्रभक्त अधिवक्ता समिती’च्या वतीने ‘वाढता अर्बन नक्षलवाद आणि जनसुरक्षा कायदा’ या विषयावर विशेष परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. या परिसंवादात ते बोलत होते.

‘राष्ट्रभक्त अधिवक्ता समिती’ च्या वतीने ‘वाढता अर्बन नक्षलवाद आणि जनसुरक्षा कायदा’ या विषयावर विशेष परिसंवादात उपस्थित विविध क्षेत्रांतील अभ्यासू, हिंदुत्वनिष्ठ आणि धर्मप्रेमी

वक्त्यांच्या भाषणांना उपस्थितांनी दिला उत्स्फूर्तपणे टाळ्या वाजवून प्रतिसाद !

परिसंवाद मांडले जाणारे विषय, डाव्यांची पोलखोल यांमुळे वक्त्यांच्या भाषणांना उपस्थितांनी उत्स्फूर्तपणे टाळ्या वाजवून, तसेच ‘जय श्रीराम’, ‘जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम्’यांसह विविध घोषणा देऊन प्रतिसाद दिला.

या परिसंवादात ‘असत्यमेव जयते’ आणि ‘डावी वाळवी’ या पुस्तकांचे प्रसिद्ध लेखक श्री. अभिजित जोग, हिंदु विधीज्ञ परिषदेचे अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट, लेखक-विचारवंत श्री. विक्रम भावे आणि श्री. ज्येष्ठ पत्रकार श्री. प्रसाद काथे हे मान्यवर सहभागी झाले होते. पुणे जिल्ह्यासह राज्यभरातून विविध क्षेत्रांतील अभ्यासू, हिंदुत्वनिष्ठ आणि धर्मप्रेमी असे १ सहस्रहून अधिक राष्ट्रप्रेमी या परिसंवादाला उपस्थित राहिले. परिसंवादात हिंदु जनजागृती समितीचे श्री. सतीश कोचरेकर यांनी प्रास्ताविक केले, तर सूत्रसंचालन श्री. चैतन तागडे यांनी केले.

माधव भांडारी पुढे म्हणाले की,

माधव भांडारी

१. मी अनेक वर्षे डावी, साम्यवादी यांची ढोंगबाजी पहात आहे. समाजवादी लोक कधीच प्रामाणिकपणे वागत नाहीत. ते बोलतात एक आणि कृती दुसरीच करतात. यातील अनेकांच्या घरात देवघर असते. ते घरात पूजा करतात आणि बाहेर मात्र हिंदु धर्म, देवता यांच्यावर टीका करतात.

डाव्यांना भारत हा ‘देश’च वाटत नाही ! – माधव भांडारी

या प्रसंगी श्री. विक्रम भावे म्हणाले, ‘‘मी कारागृहात असतांना मी कोरेगाव भीमा प्रकरणात अटक झालेल्या एका नक्षलवाद्याचे आरोपपत्र पाहिले होते. या आरोपपत्रात त्याची एक छोटी नोंदवही जोडण्यात आली होती. या नोंदवहीत जंगलातील नक्षलवाद्यांना किती अल्पाहार, जेवण द्यावे यांपासून ‘बाबरीचे पतन हा निषेध दिवस पाळावा’, असा उल्लेख करण्यात आला होता. या पुस्तकात आपण विचारही करू शकत नाही अशा अनेक धक्कादायक गोष्टी होत्या.’’ या संदर्भात श्री. माधव भांडारी म्हणाले, ‘‘डाव्यांना ‘भारत’ हा देशच वाटत नाही, इतकी भयानक स्थिती आहे. या सर्व डावे, साम्यवादी यांचा आदर्श हा चीनमधील ‘माओ’ असून त्यांच्या साहित्याच्या आधारेच येथील नक्षलवादी, साम्यवादी साहित्याची निर्मिती करतात.

२. पूर्वी केवळ गावांमध्ये, जंगलांमध्ये असलेला नक्षलवाद आता त्याहीपेक्षा अधिक धोकादायक झाला असून तो शहरांतमध्ये बौद्धिक वर्गात पसरला आहे.

३. हा नक्षलवाद बौद्धिक हिंसाचार घडवून आणतो त्यामुळे सध्या ‘जनसुरक्षा कायद्या’ची सर्वाधिक आवश्यकता आहे.

मानवी मनावर प्रभाव टाकणार्‍या संस्था नष्ट करणे, हा डाव्यांचा अजेंडा (कार्यसूची) ! – अभिजित जोग, प्रसिद्ध लेखक

अभिजित जोग

मानवी मनावर प्रभाव टाकणार्‍या संस्था नष्ट करणे, त्यांना डाव्या विचारसरणीने पोखरणे हा डाव्यांचा अजेंडा आहे. शिक्षणसंस्था, चित्रपट, कुटुंबव्यवस्था, जातीव्यवस्था, तरुण मुलांमध्ये भ्रम निर्माण करणे, यांचा यात समावेश होतो. समाजात सतत अराजक निर्माण करणे, हेच सातत्याने साम्यवादी करतात. यात प्रामुख्याने गरीब-श्रीमंत भेद निर्माण करणे, स्री-पुरुष यांच्यात वाद निर्माण करणे आणि या ना त्या कारणाने समाजात सतत संघर्ष निर्माण करण्यासाठी साम्यवादी प्रयत्नरत असतात. साम्यवादी सातत्याने भारतीय संस्कृतीवर आक्रमण करतात. त्यामुळे ही लढाई आपल्याला वैचारिक स्तरावर लढावी लागेल. देशाच्या हिताचा विचार, संस्कृतीचा विचार रूजवाला लागेल.’’

वारीत ज्याप्रकारे संविधान दिंडी निघते त्याप्रकारे ‘ताबूत’ मिरवणुकीत संविधान दिंडी काढावी ! – परिसंवादात आवाहन

(ताबूत किंवा ताजिया ही मुसलमानांच्या इमाम हुसैन यांच्या समाधीची प्रतिकृती. मिरवणुकीत ती अनेक प्रकारात आणि आकारात बनवून हातात घेतली जाते.)

परिसंवादात श्री. अभिजित जोग म्हणाले, ‘‘वारकर्‍यांची निघणारी आषाढीवारी ही मुळात धार्मिक घटक असतांना त्यात अंधश्रद्धा निमूर्लन समिती, साम्यवादी हे ‘संविधान दिंडी’ आणून वारकर्‍यांची दिशाभूल करतात. त्याच साम्यवाद्यांनी हाच प्रयोग ताबूत मिरवणुकीतही करावा.’’ यावर श्री. माधव भांडारी यांनीही साम्यवाद्यांना ताबूत मिरवणुकीत संविधान दिंडी काढावी, असे आवाहन आपण केले पाहिजे, असे मत व्यक्त केले.

जनसुरक्षा कायद्याची व्याप्ती वाढवण्यासाठी आणि कलमे आणि शिक्षा कडक होण्यासाठी प्रयत्न करावे लागतील ! – अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, अध्यक्ष, हिंदु विधीज्ञ परिषद

अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर

कितीही नवीन कायदे केले, तरी व्यवस्थेची मानसिकता पालटणे आवश्यक आहे. सर्व हिंदूंनी धर्मावर, देवावर विश्वास ठेवून कार्य करायला हवे. हिंदूंना ईश्वरी अनुभूतीचे वरदान आहे. त्याचा लाभ घेण्यासाठी प्रत्येक कार्यात ईश्वरी अधिष्ठान ठेवायची सवय लावून घेतली पाहिजे. प्रत्येक वेळी विरोधकांच्या षड्यंत्राला बळी न पडता विरोधकांच्या त्रुटी ओळखून त्या उघड्या पाडणे आवश्यक आहे. भारतातील व्यवस्थेकडे पहातांना आपली दृष्टी सजग असायला हवी. आता जनसुरक्षा कायद्याची व्याप्ती मर्यादित असून अजून त्याची व्याप्ती वाढवण्यासाठी कलमे आणि शिक्षा कडक होण्यासाठी प्रयत्न करावे लागतील.

नक्षलवादाच्या विरोधात लढण्यासाठी हिंदूंची यंत्रणा निर्माण झाली पाहिजे ! – सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती

सुनील घनवट

अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या ट्रस्टमध्ये इतके घोटाळे झाले आहेत की, त्या समितीवर प्रशासक नेमून त्यांचे खरे स्वरूप पुढे आणले पाहिजे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीला कुणाकडूनही निधी मिळत नसल्याचे त्यांनी सांगितले होते; मात्र हिंदु जनजागृती समितीने पुराव्यानिशी विदेशी आस्थापनांकडून अंधश्रद्धा निर्मूलन समितीला निधी मिळाल्याचे उघड केले. आज डॉ. नरेंद्र दाभोळकर जिवंत असते, तर त्यांच्या ट्रस्टमधील घोटाळे आणि अनियमितता यांमुळे ते कारागृहात गेले असते. ज्याप्रकारे नक्षलवाद्यांनी त्यांना पाठिंबा देणारा बुद्धीजीवी वर्ग, आर्थिक पाठबळ, सर्वाेच्च न्यायालयापर्यंत लढण्यासाठी अधिवक्त्यांची साखळी निर्माण केली आहे, त्याचप्रकारे नक्षलवादाच्या विरोधात लढण्यासाठी हिंदु इकोसिस्टीम (एखादी विचारसरणी पद्धतशीरपणे पुढे रेटणारी यंत्रणा) निर्माण झाली पाहिजे. आर्थिक बळ हे साम्यवाद्यांचे बलस्थान आहेच. काही साम्यवादी लेखक, अभिनेते यांनी ‘ॲवॉर्ड वापसी’ (भारत सरकारकडून मिळालेले पुरस्कार परत केले.) केली; मात्र मिळालेले पैसे परत केले नाहीत. यातून त्यांचा दुटप्पीपणा दिसून येतो.

हिंदूंना सजग व्हावेच लागेल ! – प्रसाद काथे, ज्येष्ठ पत्रकार

प्रसाद काथे

हिंदु संस्कृतीला पर्याय नाही. इतर पंथांना त्यांचे देश आहेत; पण हिंदूंना भारताविना दुसरा आधार नाही. आपल्या पूर्वजांनी खस्ता खाल्ल्या आहेत; त्यामुळे आता आपल्यालाच सजग व्हावे लागेल.

हिंदुत्व हाच आपल्या संस्कृतीचा गाभा ! – विक्रम भावे, लेखक

विक्रम भावे

मी शाळेत असतांना अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते शाळेत यायचे. आम्हाला सांगायचे, ‘हत्तीच्या तोंडाचा, माकडाच्या तोंडाचा देव असतो का?’, ‘श्री.गुरूदेव दत्त’ नामजप करून काही लाभ होतो का? असे शालेय मुलांच्या मनात हिंदु धर्माविषयी संभ्रम निर्माण करणारे प्रश्न अंनिसवाले विचारत असत. अंनिसवाले कधीही चर्चमध्ये जाऊन ‘बायबलमध्ये पृथ्वी सपाट आहे’, असे लिहिले आहे. ते खरे का खोटे ?, असे विचारत नाहीत. मदरशात जाऊन ‘स्वर्गात ७२ हुर (अप्सरा) असतात कि नाही ?’, असे कधी विचारत नाहीत.

मी कारागृहात असतांना माझ्या लक्षात आले की, भारतीय संस्कृतीविषयी कारागृहात राहून विष पेरण्याचे काम शहरी नक्षलवादी करत आहेत. हिंदुत्व हाच आपल्या संस्कृतीचा गाभा असून आपल्याला या लढ्यात एक हिंदु म्हणून उतरावे लागेल.

सकाळपासून पाऊस असूनही परिसंवादासाठी पुणेकरांचा अभूतपूर्व प्रतिसाद !

पुण्यात गेले २ दिवस पाऊस असून परिसंवादाच्या दिवशी शहरात सकाळपासून मोठा पाऊस होता. अनेक रस्ते जलमय झाल्याने वाहतुकीची कोंडी झाली होती. असे असतांनाही पुणेकरांनी या कार्यक्रमासाठी उपस्थिती दर्शवून अभूतपूर्व प्रतिसाद दिला. परिसंवादाच्या शेवटी सभागृह पूर्णपणे भरले होते आणि काही राष्ट्रप्रेमींनी उभे राहून कार्यक्रम ऐकला.

उपस्थित मान्यवर – वीर सावरकर युवा मंचचे डॉ. नीलेश लोणकर, भोंगवली येथील दत्तगड देवस्थानाचे मठाधिपती पू. जाधव महाराज, भुकूम येथील ‘स्वयंभू श्री रामेश्वर देवस्थान ट्रस्ट’चे श्री. विजय माझिरे, मानद पशूकल्याण अधिकारी श्री. राहुल कदम, ग्राहक पेठचे श्री. सूर्यकांत पाठक, इतिहास अभ्यासक श्री. ऋत्विक कुलकर्णी, पुणे शहर भाजप सरचिटणीस सौ. प्रियंका शेडगे, श्री. प्रल्हाद सायकर, मालेगाव स्फोट खटल्यातून निर्दाेष मुक्तता झालेले हिंदुत्वनिष्ठ श्री. समीर कुळकर्णी, प्रतापगड उत्सव समितीचे श्री. विनायक सणस, विश्व हिंदु परिषद सहमंत्री श्री. दत्ता पोकळे, श्री. नाना क्षीरसागर, श्री. मदन डांगी, निवृत्त पोलीस अधिकारी श्री. प्रकाश लोंढे, हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे श्री. सचिन घुले, समरसता आयोग जिल्हाप्रमुख कविता राठोड, जेजुरी गड-कडेपठार येथील खंडोबा देवस्थानचे विश्वस्त श्री. मंगेश जेजुरीकर, पवित्रम फाऊंडेशनचे संचालक श्री. प्रकाश श्रीमणी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे गावठाण येथील श्री. प्रमोद वसहडकर, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपशहरप्रमुख श्री. भरत कुंभारकर, अधिवक्त्या गायत्री खडके, ह.भ.प तुषार महाराज चौधरी, वनमाला शिंदे, श्री. आनंद ताठे-देशमुख, श्री. रमेश ओसवाल, सनातन संस्थेच्या पू. (सौ.) मनीषा पाठक आणि पू. (सौ.) संगीता पाटील