Operation Sindoor : ‘ऑपरेशन सिंदूर’च्या प्रारंभी केवळ आतंकवादी तळ लक्ष्य असल्याने भारताने काही लढाऊ विमाने गमावली !

इंडोनेशियातील भारतीय दूतावासातील सैन्याधिकार्‍याचा दावा

इंडोनेशियातील भारतीय दूतावासातील सैन्याधिकारी कॅप्टन शिव कुमार

जकार्ता (इंडोनेशिया) /नवी देहली – ‘ऑपरेशन सिंदूर’च्या प्रारंभी भारतीय वायूदलाला पाकिस्तानी सैन्याच्या ठिकाणांवर, तसेच हवाई संरक्षण यंत्रणेवर आक्रमण करण्याची अनुमती नव्हती. केवळ आतंकवाद्यांच्या पायाभूत सुविधांना लक्ष्य करण्याचे निर्देश देण्यात आले होते. यामुळेच  भारताने काही लढाऊ विमाने गमावली, असे विधान इंडोनेशियातील भारतीय दूतावासातील सैन्याधिकारी कॅप्टन शिव कुमार यांनी केल्यानंतर वाद निर्माण झाला आहे. यावर भारत सरकारकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे.

१. १० जून या दिवशी जकार्ता येथील एका विद्यापिठात ‘भारत-पाक हवाई युद्ध आणि इंडोनेशियाची सामरिक रणनीती’ या विषयावरील चर्चासत्रात कॅप्टन शिव कुमार यांनी वरील विधान केले होते. त्याचा व्हिडिओ आता प्रसारित झाल्यानंतर वाद निर्माण झाला. यापूर्वी तिन्ही संरक्षण दलांचे प्रमुख जनरल अनिल चौहान यांनी एका मुलाखतीत काही विमाने गमावल्याची स्वीकृती दिली होती.

२. कॅप्टन शिव कुमार पुढे म्हणाले की, नंतर भारताने रणनीती पालटली आणि सैनिकी तळांना लक्ष्य केले. सर्वप्रथम शत्रूची हवाई संरक्षण प्रणाली नष्ट करण्यात आली.

सरकारने देशाची दिशाभूल केली ! – काँग्रेस

काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी शिव कुमार यांच्या विधानावर म्हटले की, यापूर्वी अनिल चौहान यांनी सिंगापूरमध्ये महत्त्वाचे खुलासे केले होते. आता इंडोनेशियामध्ये वरिष्ठ संरक्षण अधिकारी असे दावे करतात; पण पंतप्रधान सर्वपक्षीय बैठकीचे अध्यक्षपद भूषवण्यास आणि विरोधकांना विश्वासात घेण्यास का नकार देत आहेत ? संसदेच्या विशेष अधिवेशनाची मागणी का फेटाळण्यात आली ?, असे प्रश्न विचारले.

भारतीय दूतावासाचे स्पष्टीकरण

इंडोनेशियातील भारतीय दूतावासाने म्हटले आहे की, शिव कुमार यांचे विधान संदर्भहीन आहे. त्यांच्या सादरीकरणाचा हेतू आणि मूळ उद्देश चुकीचा आहे. सादरीकरणात म्हटले आहे की, भारतीय सैन्य राजकीय नेतृत्वाखाली काम करते, जे आपल्या शेजारच्या काही देशांपेक्षा वेगळे आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’चा उद्देश आतंकवादी पायाभूत सुविधांना लक्ष्य करणे, हा होता. भारताचा प्रतिसाद प्रक्षोभक नव्हता.