Pakistan Suicide Attack : पाक सैन्यावरील जिहादी आतंकवादी आक्रमणामागे भारत असल्याचा पाकचा आरोप भारताने फेटाळला

भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल

इस्लामाबाद (पाकिस्तान) / नवी देहली – पाकच्या उत्तर वझिरीस्तानमध्ये पाक सैन्याच्या वाहनावर करण्यात आलेल्या आत्मघाती आक्रमणात १३ सैनिक ठार झाल्याची घटना २८ जूनला घडली होती. या आक्रमणाचे दायित्व ‘तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तान’ या आतंकवादी संघटनेने आधीच घोषित केले असतांना पाकने भारताने हे आक्रमण केल्याचा आरोप केला. भारताने हा आरोप फेटाळून लावला.

भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत म्हटले की, वझिरीस्तान येथील आक्रमणासाठी भारताला उत्तरदायी धरणारे पाकिस्तानी सैन्याचे अधिकृत विधान आम्ही पाहिले आहे. आम्ही हे विधान पूर्ण तिरस्काराने नाकारतो.

संपादकीय भूमिका

पाकमध्ये अनेक आतंकवादी संघटना कार्यरत असतांना भारताला वेगळे काही करण्याची आवश्यकताच नाही, हे स्पष्ट असतांना स्वतःचा नाकर्तेपणा लपवण्यासाठी आणि पाकच्या जनतेच्या डोळ्यांत धूळफेक करण्यासाठी पाकला भारताचे नाव घ्यावे लागत आहे !