एस्.टी.च्या ७८ व्या वर्धापनदिनानिमित्त परिवहनमंत्र्यांकडून राज्यव्यापी वृक्षारोपण अभियानाचा शुभारंभ !

‘झाडे लावा, झाडे जगवा ; पर्यावरण संवर्धन’ प्रत्येकाचे सामूहिक दायित्व !

‘वृक्षारोपण’ करताना परिवहनमंत्री तथा एस्.टी. महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक

मुंबई – महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ७८ व्या वर्धापन दिनानिमित्त विद्या विहार येथील विभागीय कार्यालयातून राज्यव्यापी ‘वृक्षारोपण’ अभियानाचा शुभारंभ परिवहनमंत्री तथा एस्.टी. महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी आमदार दिलीप लांडे, उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांच्यासह महामंडळाचे अधिकारी अन् कर्मचारी उपस्थित होते. या अभियानाच्या माध्यमातून राज्यभरातील एस्.टी.ची बसस्थानके, आगारे, कार्यालये आणि विविध परिसरांत मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्यात आले.

परिवहनमंत्री सरनाईक म्हणाले की, हा कार्यक्रम केवळ वृक्षारोपणापुरता मर्यादित नसून भावी पिढ्यांसाठी हिरवा, समृद्ध आणि सुरक्षित महाराष्ट्र घडवण्याचा सामूहिक संकल्प आहे. वाढते जागतिक तापमान, अनियमित पर्जन्यमान, अतीवृष्टी, दुष्काळ, पूर आणि उष्णतेच्या लाटा यांसारख्या पर्यावरणीय संकटांचा सामना करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने पर्यावरण संवर्धनाचे दायित्व स्वीकारणे आवश्यक आहे. ‘एक कर्मचारी – एक वृक्ष’ आणि ‘एक नागरिक – एक वृक्ष’ हा संकल्प प्रत्येकाने स्वीकारावा. एस्.टी.चे प्रत्येक आगार, बसस्थानक आणि कार्यालय परिसर हिरवागार होण्यासाठी अधिकारी, कर्मचारी आणि प्रवासी यांनी सक्रीय सहभाग नोंदवावा.