आतंकवादाविरोधात कारवाई चालूच रहाणार – Rajnath Singh

चीनमध्ये संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी पाकला सुनावले

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह

शांघाय (चीन) – आम्ही आतंकवादाविरुद्ध कारवाई करत राहू. शांतता, समृद्धी आणि आतंकवाद एकत्र येऊ शकत नाहीत. या आव्हानांना तोंड देण्यासाठी निर्णायक कृतीची आवश्यकता आहे. आमच्या सुरक्षिततेसाठी आम्ही या गोष्टींविरुद्ध लढत राहू, अशा शब्दांत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी पाक आणि चीन यांना सुनावले. ते चीनमधील क्विंगदाओ येथे आयोजित ‘शांघाय सहकार्य परिषदे’त बोलत होते. या परिषदेमध्ये पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ हेही उपस्थित होते.‘ऑपरेशन सिंदूर’मुळे दोन्ही देशांतील तणावानंतर दोन्ही देशांचे मंत्री प्रथमच समोरासमोर आले.

शांघाय सहकार्य संघटनेच्या सदस्यांनी आतंकवाद्यांना साहाय्य करणार्‍यांचा निषेध करावा !

राजनाथ सिंह म्हणाले की, काही देश सीमेपलीकडील आतंकवादाचा वापर धोरणात्मक साधन म्हणून करतात आणि आतंकवाद्यांना आश्रय देतात. अशा दुटप्पी निकषांना स्थान नसावे. अशा देशांवर टीका करण्यास शांघाय सहकार्य संघटनेने मागे-पुढे पाहू नये. आतंकवादाचे कोणतेही कृत्य गुन्हेगारी आणि अन्याय्य आहे. त्याचा हेतू काहीही असो, कुठेही, केव्हाही आणि कुणाकडूनही अशी कृत्ये घडलेली असो, शांघाय सहकार्य संघटनेच्या सदस्यांनी या दुष्कृत्याचा स्पष्टपणे निषेध केला पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.

भारत शांतता आणि समृद्धी याला महत्त्व देतो !

पहलगाम येथील आतंकवादी आक्रमणाचा संदर्भ देत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, पहलगाम येथे धार्मिक ओळखीच्या आधारे पर्यटकांना गोळ्या घालण्यात आल्या. कोणताही देश, कितीही मोठा आणि शक्तीशाली असला, तरी एकटा कारवाई करू शकत नाही. यामुळे जागतिक व्यवस्थेत एकमेकांचा विश्वास आणि सहकार्य यांवर भर दिला पाहिजे. भारत शांतता आणि समृद्धी यांना महत्त्व देतो.

चीनला मार्गस्थ होण्यापूर्वी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी ‘एक्स’वर पोस्ट करतांना म्हटले आहे की, जागतिक शांतता आणि सुरक्षितता यांसाठी भारताचा दृष्टीकोन मांडणे आणि आतंकवादाचे उच्चाटन करणे, यांसाठी संयुक्त प्रयत्नांचे आवाहन करण्यास मी उत्सुक आहे.

बलुचिस्तानचा उल्लेख; मात्र पहलगामचा उल्लेख नसलेल्या संयुक्त निवेदनावर स्वाक्षरी करण्यास भारताचा नकार

या परिषदेच्या वेळी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी संयुक्त निवेदनावर स्वाक्षरी करण्यास नकार दिला. या निवेदनात पहलगाममधील आतंकवादी आक्रमणाचा उल्लेख टाळण्यात आला होता; परंतु बलुचिस्तानमधील कथित आतंकवादी कारवायांचा थेट उल्लेख होता.

पाकिस्तानने वारंवार भारतावर बलुचिस्तानच्या स्वातंत्र्य चळवळीला पाठिंबा देण्याचा आरोप केला आहे, जो भारताने वेळोवेळी फेटाळला आहे.