Shashi Tharoor On Terrorism : आता भारत म. गांधी यांच्याप्रमाणे दुसरा गाल पुढे करणार नाही, तर प्रत्युत्तर देणार !

काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांचे विधान !

काँग्रेसचे खासदार शशी थरूर

पनामा सिटी (पनामा) – भारतात पुन्हा आतंकवादी आक्रमण झाले, आमचा देश म.  गांधी यांच्याप्रमाणे देश दुसरा गाल पुढे करणार नाही, तर या आक्रमणाला योग्य उत्तर देईल, असे विधान काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी येथील भारतीय दूतावासात आयोजित कार्यक्रमात केले. पहलगाम येथील आतंकवादी आक्रमणाची आणि नंतर भारताने राबवलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती जगातील देशांना देण्यासाठी भारताने विविध देशांत सर्वपक्षीय शिष्टमंडळे पाठवली आहेत. यांपैकी एक शिष्टमंडळ अमेरिका खंडातील पनामा देशात पोचले आहे. तेथे थरूर बोलत होते.

शशी थरूर पुढे म्हणाले की, म. गांधी यांनी स्वातंत्र्यलढ्यात त्यांच्या धाडसी नेतृत्वातून आपल्याला शिकवले की, आपण आपल्या हक्कांसाठी नेहमी उभे राहिले पाहिजे आणि भीतीविना जगले पाहिजे. भारतात आपल्याला आज आतंकवादाशी लढावे लागत आहे. ज्या लोकांना जग आतंकवादी म्हणते, त्यांना असे वाटते की, ‘ते भारतात येऊन निष्पाप लोकांना मारून काही मोठे राजकीय किंवा धार्मिक उद्दिष्ट साध्य करत आहेत.’ कोणताही स्वाभिमानी देश अशा गोष्टींना बळी पडणार नाही. आता भारताने केवळ आतंकवाद्यांनाच नव्हे, तर त्यांना पाठिंबा देणारे आणि पोसणारे यांनाही शिक्षा करावी.

संपादकीय भूमिका

  • ७५ वर्षांनंतर भारताला विशेषतः काँग्रेसच्या खासदाराला ‘मोहनदास गांधी यांची विचारसरणी किती तकलादू होती ?’, हे लक्षात आले. याला उशिरा सुचलेले शहाणपण म्हणावे लागेल !
  • याच्याही पुढे जाऊन भारताने एकाही गालावर मार खाण्यापूर्वीच संबंधितांना नष्ट करण्याएवढे आक्रमण केले पाहिजे. तरच पहलगाम सारख्या घटना कायमच्या थांबतील !