टिटवाळा येथील महागणपति मंदिर परिसरात उरूस भरवण्‍याला हिंदुत्‍वनिष्‍ठ संघटनांचा विरोध !

विश्‍व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांची निवेदनाद्वारे मागणी

प्रशासनाला निवेदन देतांना हिंदुत्‍वनिष्‍ठ

कल्‍याण, ३० जानेवारी (वार्ता.) – टिटवाळा येथील महागणपति मंदिर हे अतिशय प्राचीन मंदिरांपैकी एक असून ते हिंदु धर्मियांचे श्रद्धास्‍थान आहे. सहस्रो भाविक येथे प्रतिदिन दर्शनासाठी येतात. मंदिराच्‍या वाहनतळाच्‍या समोर पूर्वी मजार (इस्‍लामी पीर किंवा फकीर यांचे थडगे) बांधण्‍यात आली होती. तिचे आता दर्ग्‍यात रूपांतर झाले आहे. या परिसरात उरूसाचे आयोजन केले जाते. यासाठी वाहनतळाची जागा वापरण्‍यात येते. काही निधर्मी तेथे मद्य प्राशन करून येतात. उरूसाच्‍या वेळी तसेच तेथे मांस शिजवले जाते, असे हिंदुत्‍वनिष्‍ठांचे म्‍हणणे आहे. समस्‍त हिंदु भाविकांच्‍या रोषाचा विचार करून प्रशासनाने मंदिराच्‍या वाहनतळाच्‍या जागेवर उरूस भरवण्‍यास बंदी आणावी, अशा मागणीचे निवेदन विश्‍व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांनी उपविभागीय अधिकार्‍यांना निवेदन दिले. हे निवेदन साहाय्‍यक आयुक्‍त, पोलीस उपअधीक्षक, मुख्‍यमंत्री आणि स्‍थानिक आमदार यांच्‍या नावेही देण्‍यात आले.

निवेदनात म्‍हटले आहे की,…

१. पूर्वी हा उरूस मजारीजवळ छोटेखानी स्‍वरूपात केला जात होता; मात्र त्‍याचे स्‍वरूप वाढवून महागणपति मंदिराच्‍या पार्किंगमध्‍ये उरूस साजरा केला जातो. तेथे विक्री कक्ष मांडून जत्रा भरवली जात आहे.

२. मंदिर परिसरात बळी देणे, तसेच मांसाहार करणे यांना कायद्याने बंदी आहे. मंदिर परिसरात मांसाहार करून परिसर अस्‍वच्‍छ केला जातो. यामुळे हिंदूंच्‍या धार्मिक भावना दुखावल्‍या जात असून हिंदू संतप्‍त झाले आहेत.

३. मागील २ वर्षांपासून हा संतापजनक आणि निंदनीय प्रकार होत असून २ समाजांमध्‍ये तेढ निर्माण करणारा विषय झाला आहे.

४. आम्‍ही समस्‍त हिंदु समाजाकडून स्‍थानिक रहिवासी आणि श्री गणेशभक्‍त यांच्‍या वतीने मागणी करतो की, मंदिराच्‍या पार्किंगमध्‍ये होणार्‍या कार्यक्रमावर बंदी आणावी. मजार परिसरात उरूस भरवण्‍यास आमचा आक्षेप नाही.

संपादकीय भूमिका

हिंदूंच्‍या मंदिराजवळ उरूस न भरवण्‍याविषयी हिंदुत्‍वनिष्‍ठांना निवेदन द्यावे लागणे, हे दुर्दैवी !