Bharat Ratna For Ratan Tata : मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडला शोक प्रस्‍ताव !

रतन टाटा यांना ‘भारतरत्न’ देण्‍याची केंद्रशासनाला विनंती करणारा प्रस्‍ताव !

पद्मविभूषण रतन टाटा यांना श्रद्धांजली वाहताना मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , उपमुख्यमंत्री अजित पवार व अन्य

मुंबई, १० ऑक्‍टोबर (वार्ता.) – ज्‍येष्‍ठ उद्योगपती ‘पद्मविभूषण’ रतन टाटा यांना १० ऑक्‍टोबर या दिवशी राज्‍य मंत्रीमंडळाच्‍या बैठकीत श्रद्धांजली वहाण्‍यात आली. मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याविषयीचा शोकप्रस्‍ताव बैठकीत मांडला. रतन टाटा यांचे कार्यकर्तृत्‍व लक्षात घेऊन त्‍यांना ‘भारतरत्न’ देण्‍याची केंद्रशासनाकडे विनंती करणारा प्रस्‍तावही संमत करण्‍यात आला.

शोक प्रस्‍तावात म्‍हटले आहे की,

१. उद्यमशीलता हा समाज उभारणीचा प्रभावी मार्ग असतो. उद्योगांच्‍या उभारणीनेच देश प्रगतीपथावर नेता येतो; मात्र त्‍यासाठी हृदयात निस्‍सीम देशप्रेम आणि समाजाप्रती प्रामाणिक कळवळा हवा. रतन टाटा यांच्‍या रूपाने आपण अशा विचारांचा समाजसेवी, द्रष्‍टा आणि देशप्रेमी मार्गदर्शक गमावला.

२. ते महाराष्‍ट्राचे सुपुत्र होते. स्‍वयंशिस्‍त, स्‍वच्‍छ कारभार आणि मोठमोठे उद्योग सांभाळतांना पाळलेली उच्‍च प्रतीची नैतिक मूल्‍ये या कठोर कसोट्या पार पाडत टाटा यांनी आंतरराष्‍ट्रीय पातळीवर स्‍वतःचा आणि भारताचाही ठसा उमटवला. त्‍यांच्‍या रूपाने देशाचा प्रमुख आधारस्‍तंभ कोसळला आहे.

३. त्‍यांनी नैतिक मूल्‍यांची जी जपणूक केली, ती इतर उद्योजक आणि उद्योगविश्‍वातील भावी पिढ्या यांच्‍यासाठी दीपस्‍तंभासारखी मार्गदर्शक ठरतील. ते तत्त्वनिष्‍ठ कर्मयोगी होते.

४. मुंबईवरील आतंकवादी आक्रमणानंतर त्‍यांनी दाखवलेला खंबीरपणा स्‍मरणात रहाणारा आहे. कोरोना महामारीच्‍या काळात रतन टाटा यांनी ‘पी.एम्. रिलीफ फंडा’ला तात्‍काळ १ सहस्र ५०० कोटी रुपये दिले, तसेच रुग्‍णांसाठी त्‍यांची बहुतांश उपाहारगृहे उपलब्‍ध करून दिली.

५. त्‍यांनी कधीही टाटा समूहाने घालून दिलेल्‍या मूल्‍यांशी तडजोड केली नाही. टाटा समूहाच्‍या विशाल परिवाराच्‍या दुःखात मंत्रीमंडळ सहभागी आहे. त्‍यांच्‍या आत्‍म्‍याला सद़्‍गती लाभो, ही प्रार्थना ! देशाच्‍या या महान सुपुत्राला महाराष्‍ट्रातील समस्‍त नागरिकांच्‍या वतीने राज्‍य मंत्रीमंडळाची भावपूर्ण श्रद्धांजली !