नवरात्रीनिमित्त रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात श्री शाकंभरीदेवी याग !

आरती करतांना १ श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ आणि २ श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ, तसेच आरती म्हणतांना ३ सौ. सायली करंदीकर आणि टाळ वाजवतांना श्री. जयवंत रसाळ

रामनाथी (फोंडा) – नवरात्रीनिमित्त आदिशक्ति जगदंबेच्या उपासनेसाठी येथील सनातनच्या आश्रमात ३ ऑक्टोबर या दिवशी शाकंभरीदेवी यागाला आरंभ झाला. सप्तर्षींच्या आज्ञेने घटस्थापनेच्या तिथीपासून विजयादशमीपर्यंत, म्हणजेच ३ ते १२ ऑक्टोबरपर्यंत ‘शाकंभरीदेवी याग’, ‘चंडी होम’ आणि ‘महामृत्यूंजय होम’ करण्यात येणार आहे. सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या वंदनीय उपस्थितीत हे याग करण्यात येणार आहेत.

यागाच्या ठिकाणी करण्यात आलेली देवतांची मांडणी

‘येणार्‍या काळात संपूर्ण पृथ्वीवर युद्धाची लक्षणे दिसत आहेत. अशा वेळी सर्वत्र अन्न, धान्य, भाजी यांचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे. अशा वेळी जगभरात विविध मार्गांनी साधना करणार्‍या साधकांना कोणतीही अडचण होऊ नये’, यासाठी नवरात्रीच्या कालावधीत पहिले ६ दिवस देवी शाकंभरीच्या प्रीत्यर्थ ‘शाकंभरीदेवी याग’ करण्यात येणार आहे. यानंतर सप्तमी ते नवमी या दिवसांमध्ये ‘चंडी होम’, तसेच विजयादशमीच्या दिवशी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या दीर्घायुष्यासाठी ‘महामृत्यूंजय होम’ करण्यात येणार आहे. प्रतिदिन यागानंतर लघुपूर्णाहुती देऊन आरती करण्यात येणार आहे, तसेच विजयादशमीला या सर्व यागांची महापूर्णाहुती करण्यात येणार आहे.

३ ऑक्टोबरला यागाच्या प्रथम दिवशी लघुपूर्णाहुतीनंतर श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी यागाच्या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या देवतांची आरती केली. यागाचे पौरोहित्य सनातन वेदपाठशाळेच्या पुरोहितांनी केले.

वाराणसी (उत्तरप्रदेश) येथील अन्नपूर्णा मंदिरातील पुजारी नवरात्रीच्या कालावधीत प्रतिदिन सनातन संस्थेच्या वतीने पूजन आणि प्रार्थना करणार आहेत.


शाकंभरीदेवीचा महिमा

जेव्हा पृथ्वीवर प्रचंड दुष्काळ पडला होता आणि अन्न, पीक वगैरे नव्हते. सर्व भाज्या-फळांच्या जाती लुप्त झाल्या होत्या आणि नव्याने पेरण्यासाठीही बिया, धान्य वगैरे उपलब्ध नव्हते, त्या वेळी ॠषीमुनींनी या संकटातून मार्ग मिळण्यासाठी आदिशक्ती महामायेची उपासना केली. त्या वेळी आदिशक्ती महामाया ‘शाकंभरी’ या रूपात प्रकट झाली. शाक म्हणजे भाज्या ! अशा प्रकारे या देवीच्या माध्यमातून आता पृथ्वीवर सर्व प्रकारचे धान्य, भाज्या वगैरे उपलब्ध आहेत. शाकंभरीदेवीलाच ‘अन्नपूर्णा’ असेही म्हणतात.