‘आज जी काही सेवा करता येईल ती करा, उद्या इतके साधक असतील की, तुम्हाला सेवा करण्याची संधीही मिळणार नाही !’

सेवेचे महत्त्व सांगणारे परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे २५ वर्षांपूर्वीचे बोल 

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘वर्ष १९९९ मध्ये दोनापावला, पणजी येथील सनातनच्या सेवाकेंद्रात घडलेला एक प्रसंग साधनेतील ‘सेवा’ या टप्प्याचे अनमोल महत्त्व अधोरेखित करतो. (६३ टक्के आध्यात्मिक पातळीचे साधक दांपत्य कै. प्रभाकर वेरेकर आणि कै. (डॉ.) सौ. मंगला वेरेकर यांच्या दोनापावला, पणजी, गोवा येथील निवासस्थानी काही काळ सनातन संस्थेचे कार्य चालू होते.)

वर्ष १९९९ मध्ये एकदा दोनापावला येथील सेवाकेंद्रात काही साधक सेवा करणे, तसेच दायित्व घेणे, यांविषयी बोलत होते. काही वेळाने त्या ठिकाणी परात्पर गुरु डॉक्टर आले. ते साधकांना अत्यंत मोलाचे वाक्य बोलले, ‘‘आज जी काही सेवा करता येईल ती करा, उद्या इतके साधक असतील की, तुम्हाला सेवा करण्याची संधीही मिळणार नाही.’’ त्या वेळी काही जणांना गुरुदेवांचे हे बोल अविश्वसनीय वाटले असतील; पण आता जेव्हा मागे वळून पहातो, तेव्हा ‘२५ वर्षांपूर्वी गुरुदेवांनी ‘साधकसंख्या वाढेल’, असे केलेले भाकीत आज १०० टक्के सत्य ठरले आहे’, हे लक्षात येते. आज सनातनच्या माध्यमातून सहस्रो साधक साधनारत आहेत.

गुरुदेवांचे वरील वाक्य ‘आध्यात्मिक प्रगतीसाठी सेवा किती मूल्यवान आहे’, याची जाणीव करून देणारे आहे. सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव द्रष्टे असल्याने त्यांनी सहजतेने काढलेले उद्गारसुद्धा भाकितच ठरतात. त्यामुळे ‘काळानुसार गुरु जे मार्गदर्शन करत असतात, त्याचे आज्ञापालन करणे किती महत्त्वाचे आहे’, हे यातून लक्षात येते.

साधकांची संख्या वाढल्यावर अनेक प्रकारच्या सेवा करण्याची संधी मिळणे दुर्मिळ होत जाते. त्यामुळे मिळालेली प्रत्येक सेवा साधकांनी तळमळीने आणि भावपूर्ण अन् परिपूर्ण रितीने करायला हवी.

साधकांनो, ‘परिपूर्ण सेवा करणे’ ही श्री गुरूंचे मन जिंकण्याची गुरुकिल्ली असल्याने प्रत्येक सेवेला आपल्या उन्नतीचे साधन बनवा !’

– श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ (२१.६.२०२६)