Cow Dung for Funerals  : अंत्‍यविधीसाठी लाकूड नव्‍हे, गोकाष्‍ठ वापरा !

महायुती शासनाचा प्रयत्न !

मुंबई – अंत्‍यविधीसाठी होणारा लाकडांचा वापर थांबवून त्‍याऐजी गायीच्‍या शेणापासून बनवलेले गोकाष्‍ठ वापरण्‍याविषयी महायुती शासन प्रयत्न करत आहे. यासंदर्भात अभ्‍यास समितीची स्‍थापना करण्‍यात आली असून २ महिन्‍यांत अहवाल सादर करण्‍याचे निर्देश देण्‍यात आले आहेत.

१. एका अंत्‍यविधीसाठी साधारणतः ३५० किलो लाकडे लागतात. राज्‍य पातळीवर याचा विचार करता त्‍यासाठी बेसुमार वृक्षतोड करावी लागते. अंत्‍यविधीसाठी लाकडाचा वापर केल्‍यामुळे कार्बन-डाय-ऑक्‍साईड, मिथेन यांसारखे वायू आणि उष्‍णता मोठ्या प्रमाणात बाहेर पडते. त्‍यामुळे हवेचे प्रदूषण होऊन आरोग्‍य आणि पर्यावरण यांना धोका निर्माण होतो.

२. गोकाष्‍ठाचा वापर अंत्‍यविधीसाठी केल्‍यास धूर अल्‍प प्रमाणात निघतो. गोकाष्‍ठांमध्‍ये कापूर, तूप, चंदन यांचा वापर केलेला असल्‍याने ऑक्‍सिजन बाहेर पडतो. प्रदूषण न्‍यून होऊन वृक्षतोड थांबण्‍यास साहाय्‍य होते.

३. याविषयीचा अहवाल सिद्ध करतांना अभ्‍यास समितीच्‍या बैठकीला समाजातील सर्व संबंधित घटक, सामाजिक संस्‍था, पर्यावरण विभाग आणि वन विभागाचे अधिकारी, तसेच संबंधित तज्ञांना निमंत्रित करून त्‍यांची मते जाणून घ्‍यावीत, असे स्‍पष्‍ट करण्‍यात आले आहे.

गोकाष्‍ठ वापरल्‍याचे लाभ !

गायीच्‍या शेणापासून बनवलेल्‍या गोकाष्‍ठांमध्‍ये गुलाब, चंदन, कापूर, तूप यांचा वापर केला जातो. त्‍यामुळे कार्बनचे प्रमाण न्‍यून होऊन ते १० टक्‍क्‍यांवर येते. वातावरण ‘बॅक्‍टेरिया’मुक्‍त होऊन ऑक्‍सिजनची निर्मिती होते. अंत्‍यविधीनंतर राखेचे प्रमाण न्‍यून होते.