घराणेशाहीतून येणार्‍यांना मतदान न केल्यास ते एक मिनिटात सरळ होतील ! – नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

नागपूर – माझ्या मुलांचे कल्याण करा. त्यांना तिकीट द्या. बाकी काहीही झाले तरी चालेल. माझ्या बायकोला, पोरांना तिकीट द्या. हे का चालते ? तर लोक त्यांना मते देतात. हे जे वारसा हक्कांनी आलेले आहेत, त्यांना आम्ही मतदान करणार नाही, असे ज्या दिवशी लोक ठरवतील, त्या दिवशी ते एका मिनिटात सरळ झाल्याविना रहाणार नाहीत, असे म्हणत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राजकारणातील घराणेशाहीवर जोरदार टीका केली. २१ सप्टेंबर या दिवशी आयुर्वेदावर आयोजित व्याख्यानमालेच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

नितीन गडकरी पुढे म्हणाले की,…

१. कुणाचा मुलगा किंवा मुलगी असणे यात काही पाप किंवा पुण्य नाही; पण त्याने स्वत:ला सिद्ध करायला हवे. त्यानंतर लोकांनी म्हटले पाहिजे की, तुमच्या मुलाला निवडणुकीला उभे करा.

२. ‘वसुधैव कुटुंबकम्’ हे तत्त्व मानणारी आपली संस्कृती आहे. आपण म्हणतो, ‘विश्वाचे कल्याण होवो. आपण कधीच आपले कल्याण, मग आपल्या मुलांचे कल्याण आधी होवो’, असे म्हणत नाही; पण राजकारणात काही लोक असे म्हणतात.

३. मागील ४५ वर्षांत विमानतळावर ना माझ्या स्वागतासाठी ना मला निरोप देण्यासाठी कुणी येत. निवडणूक जिंकल्यानंतरही माझ्या सत्काराचा कार्यक्रम होत नाही; कारण हे मला आवडत नाही.

४. मी दिवंगत नेते जॉर्ज फर्नांडिस, अटलबिहारी वाजपेयी यांना माझे आदर्श मानतो. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि विद्यार्थी परिषद यांतून मला चांगले संस्कार मिळाले आहेत. माझ्यात जे काही चांगले दिसते, ते त्यामुळे आहे.