पंढरपूर येथे निघालेल्या वारकर्‍यांच्या बसचा अपघात; ५ वारकर्‍यांचा मृत्यू !

मुंबई-पुणे महामार्गावर पनवेलजवळील घटना !

मुंबई – आषाढी एकादशीनिमित्त मुंबईहून पंढरपूरला निघालेल्या बसचा मुंबई-पुणे महामार्गावर पनवेलजवळ १५ जुलैच्या रात्री भीषण अपघात झाला. अचानक बससमोर एक ट्रॅक्टर आला. त्यामुळे चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. काही क्षणातच बस ट्रॅक्टरला धडकून २० फूट खोल दरीत कोसळली. अपघात इतका भीषण होता की, दोन्ही वाहनांचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे. बसमध्ये ५४ जण होते. त्यांपैकी ५ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर अपघातात घायाळ झालेल्यांना एम्.जी.एम् रुग्णालयात नेण्यात आले. काही जणांची प्रकृती चिंताजनक आहे. ट्रॅक्टरमधील २ जणांचा मृत्यू झाला आहे.