काँग्रेसच्या सर्व नेत्यांनी हिंदूंविषयीची त्यांची भूमिका स्पष्ट करावी ! – हिंदु जनजागृती समिती

आज संसदेत राहुल गांधी यांनी हिंदूंचा ‘हिंसाचारी’ अशी प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. याचा आम्ही तीव्र निषेध करतो. हिंदूंना अपकीर्त करण्याचे त्यांचे हा पहिला प्रयत्न नाही; यापूर्वी काँग्रेसने ‘भगवा आतंकवाद’ आणि ‘हिंदु आतंकवाद’ संकल्पना मांडण्याचा प्रयत्न केला आहे. जागतिक हिंदु समाज आज सार्वत्रिक शांतता आणि कल्याण यांच्या विचारधारेसाठी ओळखला जातो. ‘वसुधैव कुटुम्बकम्’ किंवा ‘संपूर्ण जग एक कुटुंब’ या तत्त्वाचे प्रतिनिधित्व करतो. या समाजाला ‘हिंसाचारी’ किंवा ‘आतंकवादी’ म्हणून संबोधणे, ही त्याची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न आहे. राहुल गांधी यांच्या विरोधात कठोर कारवाई केली पाहिजे आणि काँग्रेसच्या सर्व नेत्यांनी हिंदूंविषयीची त्यांची भूमिका स्पष्ट केली पाहिजे, असे हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे म्हटले आहे.

श्री. रमेश शिंदे

रमेश शिंदे यांनी मांडलेली सूत्रे 

१. काँग्रेस नेहमीच जागतिक पातळीवर हिंदु समाजाला अपकीर्त करण्याचा प्रयत्न करते. राहुल गांधी यांचे मंदिरांना भेटी देणे आणि पवित्र धागा धारण बांधणे, ही फसवणूक होती; कारण आता त्यांनी हिंदु समाज ‘हिंसाचारी’ असल्याचे म्हटले आहे.

२. राहुल गांधी ज्या म. गांधी यांच्या अहिंसेच्या शिकवणीचा अनेकदा संदर्भ देतात, ते म. गांधी स्वतः हिंदु होते. त्यांचा चतुर्वर्णावर विश्वास होता, हे राहुल गांधी यांनी जाणावे.

३. वर्ष १९९० च्या दशकात काश्मिरी हिंदूंना काश्मीरमधून कुणी विस्थापित केले ? कोणत्या समाजाने हे विस्थापन केले, हे राहुल गांधी सांगतील का ? काश्मिरी हिंदूंनी ज्या अन्यायांचा सामना केला, त्यांतील किती विस्थापित काश्मिरी हिंदूंनी ‘एके-४७’ सारखी शस्त्रे उचलली ?, यावरही राहुल गांधी यांनी भाष्य करावे.

संपादकीय भूमिका

हिंदूबहुल भारतात हिंदूंना हिंसाचारी ठरवणार्‍या राहुल गांधींवर कठोर कारवाई व्हायला हवी !