वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र अधिवेशनाचा पाचवा दिवस (२८ जून) उद़्‍बोधन सत्र – मदिंरांचे सुव्‍यवस्‍थापन

मंदिर आधारित अर्थव्‍यवस्‍था नष्‍ट झाल्‍यामुळे भारतात साम्‍यवाद आणि भांडवलशाही यांचा शिरकाव ! – अंकित शहा, गुजरात

श्री. अंकित शहा

विद्याधिराज सभागृह – अर्थशास्‍त्रज्ञ अ‍ॅडम स्‍मित यांचे अर्थकारण भांडवलशाहीवर आधारित आहे. त्‍यामुळे जगातील ९० टक्‍के संपत्ती ५ टक्‍के लोकांकडे जमा झाली. विश्‍वातील १०० श्रीमंत लोकांची सूची सिद्ध केली जाते. अशा प्रकारे वैयक्‍तिकरित्‍या संपत्तीचा संचय होणे विश्‍वासाठी योग्‍य नाही. आपण इतक्‍या धनाचा संचय करू नये की, अन्‍य गरीब होतील आणि त्‍यांना फूकट देण्‍याची वेळ येईल. एखाद्याला फूकट देणे किंवा विनामूल्‍य देण्‍याची पद्धत कार्ल मार्क्‍स याने रूढ केली. मतांच्‍या राजकारणातून फुकट सुविधा किंवा वस्‍तू देण्‍याची पद्धत वाढली आहे. भारतीय अर्थशास्‍त्र मात्र आत्‍मनिर्भर बनवते. सनातन धर्माच्‍या अर्थशास्‍त्रामध्‍ये मंदिरांचे स्‍थान अतिशय महत्त्वाचे आहे.

सनातन धर्मामध्‍ये मंदिरांच्‍या अर्थकारणातून शिक्षणप्रणाली चालवली जात होती. मंदिरांमधील अर्थव्‍यवस्‍थेवरून गावांची निर्मिती होत होती. इंग्रज भारतामध्‍ये आल्‍यावर त्‍यांनी ‘शिक्षण विभाग’ ही पद्धत चालू केली.

भारतीय संस्‍कृतीमध्‍ये सर्व प्राणीमात्रांच्‍या हिताचा विचार !

भारतामध्‍ये प्राणी आणि मानव यांच्‍यासाठी वेगळे अधिकार नव्‍हते. भारतीय संस्‍कृतीमध्‍ये सर्व प्राणीमात्र्यांच्‍या हिताचा विचार केला आहे; पाश्‍चात्‍य मात्र प्राण्‍यांना खाऊन प्राणीरक्षणाच्‍या गोष्‍टी करतात. भारतीय संस्‍कृतीमध्‍ये वन, प्राणी, नदी यांचा विचार करून स्‍वत:च्‍या रहाण्‍याचे स्‍थान निश्‍चित केले जात होते. सद्य:स्‍थितीत मात्र आधी घर बांधले जाते, त्‍यानंतर पाण्‍याची व्‍यवस्‍था केली जाते. आपल्‍या देवतांना विविध फळे आणि पुष्‍प अर्पण करण्‍याची पद्धत आहे. देवतांचे वाहन म्‍हणून विविध पशू-पक्षी यांना दाखवले जाते. पशू, पक्षी आणि पर्यावरण यांचा विचार सनातन धर्मामध्‍ये पूर्वीपासून केला जात आहे. मंदिराच्‍या परिसरात गुरुकुल मध्‍ये शिकलेला विद्यार्थी कधीही पर्यावरण प्रदूषित करणार नाही, असे अंकित शहा यांनी म्‍हटले.

भारतामध्‍ये शिक्षणाचे संचलन राजा कधीही करत नव्‍हता. भारतातील शिक्षणपद्धत मंदिराच्‍या अर्थकारणातून चालत होती. ऋषिमुनी अभ्‍यासक्रम निश्‍चित करत होते. राजा भ्रष्‍ट झाल्‍यावर आर्य चाणक्‍यांनी समाजाला संघटित करून राजा धनानंद याला सत्ताच्‍युत केल्‍याचे उदाहरण आपल्‍या इतिहासात आहे. ब्रिटिशांनी शिक्षणप्रणाली सरकारच्‍या कह्यात दिली. ‘नोकरीसाठी शिक्षण’ ही पद्धत ब्रिटिशांनी रूढ केली. मागील ४०० वर्षांमध्‍ये हे झाले आहे. गुरुकुल हे मंदिराच्‍या परिसरातच असावे. मंदिरांची अर्थव्‍यवस्‍था नष्‍ट झाल्‍यामुळेच भारता साम्‍यवाद आणि भांडवलशाही आली. यांचा पुरस्‍कार करण्‍याऐवजी मंदिरांवर आधारित अर्थव्‍यवस्‍थेचे ज्ञान आपण पाश्‍चात्‍यांना दिले पाहिजे, असे वक्‍तव्‍य गुजरातमधील हिंदुत्‍वनिष्‍ठ श्री. अंकित शहा यांनी केले. ते ‘मंदिर अर्थशास्‍त्र’ या विषयावर बोलत होते.

हिंदु जनजागृती समितीचे प्रसिद्धीपत्रक –

मंदिरात प्राण असल्‍यामुळे ते वास्‍तुरचनेनुसार बांधले पाहिजे ! – अभिजीत साधले, दक्षिण गोवा

श्री. अभिजीत साधले

विद्याधिराज सभागृह – मंदिर हे उपासनेचे आणि सामाजिक उत्‍सवाचे केंद्र आहे,  तसेच ते आध्‍यात्मिक अन् आत्‍मोन्‍नती यांचे केंद्र आहे. मंदिराची वास्‍तूरचना मानवाच्‍या जीवनाचे एक अंग आहे. प्रत्‍येक मंदिरात देवाचा वास असतो. त्‍यामुळे त्‍यात प्राण असतो.  मंदिराची वास्‍तूरचना केवळ रचना नाही, तर मानवी जीवनाप्रमाणे मंदिराचे जीवन आहे, हे लक्षात घेऊन मंदिर वास्‍तूरचनेनुसार बांधले पाहिजे, असे प्रतिपादन दक्षिण गोवा येथील अभिजीत साधले यांनी ‘वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवा’च्‍या पाचव्‍या दिवशी केले. ते ‘धर्मशास्‍त्राच्‍या दृष्‍टीकोनातून मंदिराचे सुव्‍यवस्‍थापन’ या विषयावर बोलत होते.

अभिजीत साधले म्‍हणाले, ‘‘सध्‍या अनेक मंदिरे बांधतांना केवळ सौंदर्याचा विचार केला जातो. त्‍यामुळे ती वास्‍तूशास्‍त्राचा अभ्‍यास न करता बांधण्‍यात येतात. हिंदु मंदिरे लोकपरंपरा आणि वास्‍तूपरंपरा यांच्‍या समुच्‍चयाने बनलेली आहेत. मंदिरातील गर्भगृह, सभामंडप आणि शिखर यांच्‍यामागे सखोल शास्‍त्र आहे. सध्‍या मंदिराच्‍या आत मोठ्या प्रमाणात प्रकाश योजना केली जाते. बाह्य प्रकाशाने देवाचे दर्शन होत नाही. त्‍यामुळे प्राचीन मंदिरात जातांना प्रकाश अल्‍प होत जातो आणि गर्भगृहात पूर्ण अंधार असतो. त्‍यामुळे मंदिरात जाण्‍याच्‍या पद्धतीचे पालन केले पाहिजे. आपली मंदिर संस्‍कृती सहस्रो वर्षांपासून परंपरने आपल्‍यापर्यंत चालत आली आहे. त्‍यामुळे तिचे जतन करून पुढील पिढ्यांपर्यंत ती योग्‍य पद्धतीने सोपवणे आपले कर्तव्‍य आहे.’’


मंदिरांत अर्पणाच्‍या रूपाने येणारा निधी मंदिरांच्‍याच जीर्णोद्धार आणि डागडुजी यांसाठी वापरणे आवश्‍यक ! – गिरीश शाह, विश्‍वस्‍त, महाजन एन्.जी.ओ., मुंबई

श्री. गिरीश शाह

विद्याधिराज सभागृह – मंदिर हे संस्‍कार, संस्‍कृती आणि सुरक्षा यांचे मुख्‍य केंद्र आहे. काळाच्‍या ओघात ज्‍या मंदिरांची पडझड झाली त्‍यांचे पुनर्निर्माण आणि डागडुजी करणे आवश्‍यक आहे. हे पुनर्निर्माणाचे कार्य करतांना पुरातन मंदिरांची संरचना सुरक्षित राखणे आवश्‍यक आहे. मंदिराची शिखर, गर्भगृह, रंगमंडप आणि सभामंडप अशी रचना असते. प्रत्‍यके देवतेच्‍या मंदिराच्‍या रचनेमध्‍ये थोडा भेद असतो. भारताच्‍या कानाकोपर्‍यात लाखो मंदिरे आहेत. मंदिरांनीच आपल्‍या संस्‍कृतीचे रक्षण केले आहे. भारतात रहाणार्‍या प्रत्‍येकाला ही संस्‍कृती मानावीच लागेल, असे उद़्‍गार मुंबई, महाराष्‍ट्र येथील महाजन एन्.जी.ओ.चे विश्‍वस्‍त गिरीश शाह यांनी येथे बोलतांना काढले. वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र अधिवेशनाच्‍या पाचव्‍या दिवशी ते ‘मंदिर स्‍थापत्‍याचे नियोजन’ या विषयावर बोलत होते.

मंदिरांत अर्पणाच्‍या रूपाने येणारा निधी मंदिरांच्‍याच जीर्णोद्धार आणि डागडुजी यांसाठी वापरला गेला पाहिजे. गोमातेची सुरक्षा हेही मंदिराचे दायित्‍व आहे. मंदिरांनी  गुरुकुल परंपरा चालू ठेवली पाहिजे. भारताच्‍या गौरवशाली परंपरेचे जतन आणि प्रसार करण्‍याचे दायित्‍व मंदिरांनी स्‍वीकारले पाहिजे, असेही ते म्‍हणाले.


मंदिराचे सौंदर्यीकरण करायला ती पर्यटनस्थळे नव्हेत, तीर्थक्षेत्रे आहेत ! – अनिल कुमार धीर, संयोजक, ‘इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट अँड कल्चरल हेरिटेज’, ओडिशा

श्री. अनिल धीर

रामनाथी, गोवा – ओडिशामधील सुप्रसिद्ध जगन्नाथ मंदिराचे सौंदर्यीकरण करण्यासाठी २२ प्राचीन मठ तोडण्यात आले. या विरोधात आम्ही न्यायालयात गेलो, तर आम्हालाच १ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. जी मंदिरे मुळातच सुंदर आहेत, त्यांचे सौंदर्यीकरण कशासाठी करायचे ? प्लास्टिकची झाडे आणि खांब उभारणे, सर्व चकाचक करणे, यांसाठी ही पर्यटनस्थळे नव्हेत, ती तीर्थक्षेत्रे आहेत. फळवाले, फुलवाले, बाहेर बसणारे बाबा हे सर्व मंदिरांच्या ‘व्हरनॅक्युलर इकोसिस्टिम’चा (एकमेकांवर अवलंबून असलेली स्थानिक व्यवस्थेचा) भाग आहेत. त्यांना हटवून कसे चालेल ? जगन्नाथ मंदिरात २ रत्नभंडार आहेत, त्यांपैकी एक गेली ४६ वर्षे उघडलेले नाही. तेथे पडझड झाली आहे. आता निवडून आलेल्या सरकारकडून हे काम रथयात्रेच्या काळात केवळ ७ दिवसांत तेथील दुरूस्ती करण्यास सांगण्यात आले आहे. प्रत्यक्षात ७ दिवसांत ते शक्य नाही. आमच्या दृष्टीने मंदिराची स्थापत्यरचना नीट रहाणे महत्त्वाचे आहे; त्यातील धन मिळाले नाही, तरी चालेल, असे प्रतिपादन वैश्विक हिंदु राष्ट्र अधिवेशनात ‘पुरातत्त्व विभागाकडून  संरक्षित मंदिरांच्या रक्षण होण्यासाठी भारत सरकारकडून अपेक्षा’ या सत्रात ‘इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट अँड कल्चरल हेरिटेज’चे संयोजक श्री. अनिल कुमार धीर यांनी केले.

‘इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट अँड कल्चरल हेरिटेज’च्या माध्यमातून श्री. धीर करत असलेले कार्य

१. ‘इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट अँड कल्चरल हेरिटेज’ (इनटॅक) या संस्थेला केंद्र सरकारने ‘सेंटर फॉर एक्सलन्स’चा दर्जा देऊन १०० कोटी रुपये दिले आहेत आणि अजून १०० कोटी रुपये देणार आहे. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण या संस्थेनंतर ‘इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट अँड कल्चरल हेरिटेज’ ही दुसर्‍या क्रमांकाची संस्था आहे.

२. ओडिशामध्ये ३०० मंदिरे पुरातत्त्व विभागाच्या अंतर्गत संरक्षित आहेत. १०० वर्षांपूर्वीचे मंदिर पुरातत्त्व खात्याच्या अंतर्गत येते.ओडिशाच्या १७ जिल्ह्यांतील ३०० वर्षांपूर्वीची ६ सहस्र ५०० मंदिरे मी शोधली आहेत आणि उर्वरित १३ जिल्ह्यांत शोधमोहिम घेतली, तर अशी १५ सहस्र मंदिरे सहज मिळू शकतात.

३. छत्तीसगडमधून महानदी ओडिशात येते. तिचा निम्मा भाग म्हणजे ४०० कि.मी.च्या परिसरात दोन्ही काठांवर आम्ही बैलगाडीतून फिरून सर्वेक्षण केले. या नदीत ६३ मंदिरे मागील ८० वर्षे पाण्याखाली गेली आहेत. ‘त्यांतील २-३ मंदिरे तरी उचलून बाहेर काढून त्याचे पुनर्निमाण करा’, अशी मागणी आम्ही केली होती.

४. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण ही जुनी आणि सक्षम लोकांची सरकारी संस्था आहे. जगभर तिने अनेक कामे केली आहेत; परंतु सध्या ताजमहाल, कुतुबमिनार आदींकडून तिला निधी मिळत असल्याने त्यांच्याकडे तिचे लक्ष आहे. आज बंगालमध्ये नवीन मंदिरांपेक्षा उद्ध्वस्त (अवशेष राहिलेल्या) झालेल्या मंदिरांचीच संख्या पुष्कळ म्हणजे जवळजवळ एक पंचमांश आहे. कुणीही जात नसले, तरी जुन्या मशिदींची देखभाल सरकारी पैशांतून केली जाते. आज हिंदूंची प्राचीन मंदिरे पहाण्यासाठी पैसे द्यावे लागतात. आपल्या पूर्वजांची देण आपण भावी पिढीला जशीच्या तशी दिली पाहिजे.

५. आज अनेक चोरल्या गेलेल्या प्राचीन मूर्ती परत मिळालेल्या आहेत, ज्या जिल्हाधिकारी, पोलीस यांच्याकडे पडून आहेत; कारण त्या मूर्ती कुठल्या आहेत ? याची नोंदच नाही; म्हणून आम्ही प्रत्येक मंदिरातील मूर्तीची सर्व माहिती नोंद करण्याचे काम चालू केले आहे.

श्री. धीर पुढे म्हणाले की, आपण कुठल्या आधारावर विश्वगुरु होणार आहोत ? मोहंजोदडो, हडप्पा यांच्या संशोधनानंतर कुठलेही मोठे संशोधन झाले नाही. संशोधन करण्यासाठी उत्खनन करण्याची आवश्यकता नाही, अन्य भागातही आपल्या प्राचीन संस्कृतीचे अनेक पुरावे मिळतात; परंतु त्याविषयीचे संशोधनच होत नाही. आता वैज्ञानिक प्रगतीमुळे लोकांची गुणसूत्रे (जीन्स) कुठली आहेत, ते कळते. त्यावरून प्राचीन काळी येथूनच लोक बाहेर गेले आहेत, हे येत्या काळात लक्षात येऊ शकते. ज्याला ‘रिव्हर्स इन्व्हेशन’ (उलट शोध) म्हटले जाईल. याविषयीचे संशोधन बाहेर आले, तर येत्या काळात इतिहासाचे पुनर्लेखन करण्याची वेळ येणार आहे.

ओडिशातील सूर्यमंदिरात ३७ टन वजनाचा दगड शिखरावर गेला कसा ? याचे उत्तर अजून व्यवस्थित मिळालेले नाही. त्या बांधकामात १ इंचही चूक झाली असती, तरी पूर्ण बांधकाम चुकू शकले असते. अशी मंदिरे कशी उभारली गेली ? अशा प्रकारच्या मंदिर संस्कृतीविषयीच्या संशोधनाची आवश्यकता आहे.