बालकामगार दिसल्यास ‘चाईल्ड हेल्पलाईन’ क्रमांक १०९८ वर संपर्क साधावा ! – श्रीकांत हावळे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी


रत्नागिरी – बालकामगार (प्रतिबंध आणि नियमन) अधिनियम १९८६ आणि सुधारित अधिसूचना २०१६ नुसार सर्वच व्यवसायिक आणि प्रक्रियामध्ये १४ वर्षांखालील बालकांस काम करावयास प्रतिबंध आहे. बालमजुरी ही अनिष्ठ प्रथा संपवून बालकामगारमुक्त महाराष्ट्र करण्याकरता आपल्या परिसरामध्ये कुठेही बालकामगार दिसल्यास ‘चाईल्ड हेल्पलाईन’ क्रमांक १०९८ वर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्रीकांत हावळे यांनी केले.

जागतिक बाल कामगार प्रथा विरोधी दिनाचे औचित्य साधून जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय अंतर्गत जिल्हा बाल संरक्षण कक्ष संलग्न चाईल्ड हेल्पलाईन, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि बाल कामगार विभाग रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरी बाजारपेठ परिसरात फेरीचे आयोजन करण्यात आले होते. या फेरीचे  उद्घाटन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्रीकांत हावळे यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते.

 

या वेळी जिल्हा बाल संरक्षण अधिकारी समृद्धी वीर, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सहाय्यक लोक अभिरक्षक यतिन धुरत, डेप्युटी चिफ लिगल हेड डिफेन्स काउन्सिल उन्मेश मुळ्ये, असिस्टंट लिगल हेड डिफेन्स काउन्सिल गौरव भाटकर, पर्यवेक्षक श्रीमती खांडेकर, चाईल्ड हेल्पलाईन प्रकल्प समन्वयक अन्वी शिंदे आणि कर्मचारी वर्ग उपस्थित होता.

या वेळी समृद्धी वीर म्हणाल्या, ‘‘१४ वर्षांखालील बालकास कुठेही कामावर ठेवल्याचे आढळल्यास रुपये २० सहस्र दंड आणि १ वर्षाची शिक्षा कायद्याने तरतूद केली आहे. १४ ते १८ वयोगटांतील किशोरवयीन बालकास धोकादायक व्यवसाय आणि प्रक्रियेमध्ये कामावर ठेवल्यास दुकान मालकावर फौजदारी गुन्हा नोंद होतो. या फौजदारी गुन्ह्यामध्ये ६ महिने आणि २ वर्षांपर्यंत शिक्षा अन् २० ते ५० सहस्र रुपये दंड किंवा दोन्ही स्वरूपाची शिक्षा होते. त्यामुळे आपल्या आस्थापनामध्ये कुठेही बालमजुर ठेवू नका.’’

अन्वी शिंदे म्हणाल्या, ‘‘बालकामगारास आर्थिक, कौटुंबिक किंवा सामाजिक कारणामुळे कोवळ्या वयातच अर्थार्जनाची कास धरावी लागते. या प्रश्नाकडे केवळ कायद्याखालील तरतुदी आणि त्याअंतर्गत असलेल्या उपाययोजना पुरते मर्यादित दृष्टीने न पहाता बालमजुरी या प्रश्नाच्या निर्मूलनासाठी समाजाची मानसिकता आणि त्या समस्येकडे पहाण्याच्या दृष्टिकोनात पालट होणे आवश्यक आहे.’’