श्रीरामाच्या आरतीच्या वेळी पू. (श्रीमती) वैशाली मुंगळेआजी (ईश्वरपूर (सांगली)) यांच्या घरी आपोआप आलेली नामजपाची माळ !

पू. (श्रीमती) वैशाली मुंगळेआजी

१. वर्ष २००९ मध्ये पू. (श्रीमती) मुंगळेआजी यांच्या घरी श्रीरामाच्या आरतीच्या वेळी नामजपाची माळ मिळणे आणि त्याविषयी दोन संतांनी ‘साक्षात् श्रीरामाने तुम्हाला ही माळ भेट दिली आहे’, असे सांगणे

नामजपाची माळ

‘ईश्वरपूर (सांगली) येथील पू. मुंगळेआजी यांच्या घरी ‘श्रीरामाचा नामजप, आरती, स्तोत्रपठण’, असे अखंड चालू असते. त्या आरती मंडळाच्या सदस्य आहेत. त्यांच्या घरी आरती होते. वर्ष २००९ मध्ये एकदा आरती झाल्यावर त्यांना त्यांच्या पटलावर एक माळ दिसली.’ त्यांनी आरतीला आलेल्या सर्वांना विचारले, ‘‘ही माळ कुणाची आहे ?’’ तिथे आलेल्यांपैकी कुणाचीही ती माळ नव्हती. नंतर त्यांनी हा प्रसंग पू. मुंगळे महाराज (कोल्हापूर) आणि संत गोखले महाराज (गुरुजी) (सांगली) यांना सांगितला. त्या दोन्ही संतांनी ती माळ पाहून त्यांना सांगितले, ‘‘साक्षात् श्रीरामाने तुम्हाला ही माळ भेट दिली आहे.’’

२. दोन्ही संतांनी ‘माळेत पुष्कळ चैतन्य असून तिचे पावित्र्य राखण्यासाठी माळ देवघरात ठेवा’, असे सांगणे

दोन्ही संतांनी त्या माळेविषयी प्रयोग केले. तेव्हा ‘माळेमध्ये पुष्कळ अधिक चैतन्य आहे’, असे त्यांच्या लक्षात आले. संतांनी त्यांना सांगितले, ‘‘माळेचे पावित्र्य राखण्यासाठी माळ देवघरात ठेवा.’’ तेव्हापासून पू. मुंगळेआजींनी ती माळ देवघरात ठेवली आहे.

३. माळेविषयी साधकाला आलेल्या अनुभूती

श्री. शंकर नरुटे

२८.१.२०२४ या दिवशी सकाळी मी ईश्वरपूर (सांगली) येथील पू. मुंगळेआजींच्या घरी गेलो होतो. तेव्हा त्यांनी ती माळ मला प्रथमच दाखवली. ‘माळेमध्ये पुष्कळ शक्ती आणि चैतन्य आहे’, असे मला जाणवले. माळ हातात घेतल्यावर माझे मन शांत आणि निर्विचार झाले. ‘माझे ध्यान लागत आहे’, असे मला वाटले.’

– श्री. शंकर राजाराम नरुटे (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (६.२.२०२४)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक