India Pakistan Terrorist : (म्हणे) ‘भारतीय हस्तकांनी पाक नागरिकांच्या केलेल्या हत्यांचे पुरावे आहेत !’ – पाकिस्तान

‘आतंकवाद्यांना पाकमध्ये घुसून मारणार’ या संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या विधानाने पाकला मिरच्या झोंबल्या !

पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ व भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह

इस्लामाबाद (पाकिस्तान) –  ब्रिटीश वर्तमानपत्र ‘द गार्डियन’ने पाकमध्ये झालेल्या आतंकवाद्यांच्या हत्यांमध्ये भारतीय गुप्तचर संस्था ‘रॉ’चा सहभाग असल्याचा एक लेख प्रसिद्ध केला होता. त्यावर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना विचारले असता ते म्हणाले होते, ‘भारत पाकमध्ये पळून जाणार्‍या आतंकवाद्यांना पाकमध्ये घरात घुसून मारेल.’ राजनाथ सिंह यांच्या या वक्तव्यावर पाकिस्तानने प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. राजनाथ सिंह यांच्या वक्तव्याचा पाकिस्तानने निषेध करत त्याला ‘प्रक्षोभक’ म्हटले आहे. ‘भारतीय हस्तकांनी २ पाकिस्तानी नागरिकांची हत्या केल्याचा पुरावा आमच्याकडे आहे’, असा दावाही पाकने केला.

(म्हणे) ‘आंतरराष्ट्रीय समुदायाने भारताला उत्तरदायी ठरवावे !’

पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी एका मुलाखतीत केलेल्या चिथावणीखोर टिप्पणीचा पाकिस्तान निषेध करतो. २५ जानेवारी २०२४ या दिवशी पाकिस्तानने पाकिस्तानच्या भूमीवर न्यायबाह्य आणि आंतरराष्ट्रीय हत्यांच्या भारताच्या मोहिमेचे स्पष्टीकरण देणारे पुरावे दिले आहेत. मनमानीपणे आतंकवादी घोषित केलेल्या नागरिकांना पाकिस्तानमध्ये ठार मारण्याची भारताची सिद्धता हेच दाखवते की, भारत दोषी आहे आणि तो ते स्वीकारत आहे. आंतरराष्ट्रीय समुदायाने भारताला त्याच्या जघन्य आणि बेकायदेशीर कृतींसाठी उत्तरदायी ठरवणे महत्त्वाचे आहे. पाक कोणत्याही आक्रमणाविरुद्ध स्वतःच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करण्यात सिद्ध आहे.

संपादकीय भूमिका

पाकपुरस्कृत आतंकवाद्यांनी भारतात गेल्या ३ दशकांत केलेल्या आक्रमणांच्या संदर्भात भारताने पाकला आतापर्यंत शेकडो पुरावे दिले, ते पाकने कधीच स्वीकारले नाहीत. याविषयी पाक तोंड का उघडत नाही ?