पुणे – सैन्यात असलेल्या साडेचार सहस्र ‘आर्टिलरी’ अत्याधुनिक करण्यासाठी १५ वर्षांपूर्वी नियोजन केले होते; मात्र त्याचा प्रारंभ आता होत आहे. येथील ‘भारत फोर्ज आस्थापना’ला ३०७ अत्याधुनिक तोफखाना (आर्टिलरी) निर्मिती करण्याचे काम दिले आहे. त्या दृष्टीने जेजुरी येथे नवीन प्रकल्प लवकर चालू होईल.

रशिया युक्रेन युद्धामुळे जगाला पुन्हा एकदा आर्टिलरीचे महत्त्व समजले आहे. ‘आगामी युद्ध हे केवळ सायबर युद्ध होईल’, असे म्हणणार्या लोकांनाही तोफखान्याचे महत्त्व कळाले, असे मत नामांकित उद्योजक बाबा कल्याणी यांनी व्यक्त केले.
आगामी काळात संरक्षण क्षेत्राशी संबंधित उत्पादनात भारताला मोठी संधी आहे. वर्ष २०३० पर्यंत आर्टिलरी क्षेत्रात जगात सर्वाधिक प्रमाणात अर्टिलरी निर्मिती करण्याचे लक्ष आहे. कृत्रिम बुद्धीमत्तेचा (एआय) वापर संरक्षण क्षेत्रात वाढत असून त्याच्या संशोधनाला प्रोत्साहन देण्यासाठी ‘भारत फोर्ज’मध्ये प्रयोगशाळा चालू केली आहे.