श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे अनमोल विचारधन

१. अध्यात्म हे कृतीचे शास्त्र असल्यामुळे केवळ साधनेचा विचार न करता प्रत्यक्ष साधना केल्यासच मनावर साधनेचा संस्कार होणे

श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

‘साधकाची जसजशी आध्यात्मिक प्रगती होते, तसतसे त्याच्या जीवनातील सर्वकाही देवाशी जोडले जाऊ लागते. ‘देव एके देव’ एवढेच शेष रहाते. बहुतेक लोक विचारांच्या पातळीला बराच काळ रहातात. त्यांच्याकडून साधनेची कृती होत नाही. केवळ साधनेचा विचार करून चालत नाही, तर त्याप्रमाणे साधना करून अध्यात्म जगावे लागते, तरच मनावर साधनेचा संस्कार होतो; म्हणूनच ‘अध्यात्म हे कृतीचे शास्त्र आहे’, असे म्हटले जाते.

२. ‘यज्ञ, होम आणि चूल यांतील अग्नि शांत करतांना तो पुन्हा प्रज्वलित होण्यासाठी भावपूर्णतेने आणि आदरपूर्वक शांत करावा; कारण अग्नि हा नारायणस्वरूप आहे. तो आपल्याला विभूती आणि भस्म प्रदान करतो.

३. परात्पर गुरुदेवांनी (परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी) साधकांना सतत वर्तमानात रहायला शिकवून अध्यात्मजीवन जगण्याची खरी दीक्षा दिली आहे.

४. प्रत्येक गोष्ट ईश्वरावरील दृढ श्रद्धेने करावी. ‘ती चांगली होणार कि वाईट होणार ?’, याचा विचार करायला नको. यामुळे कर्म अकर्म होते आणि परिस्थितीतील खरे वर्म कळते. हेच ते ब्रह्म होय !

५. भल्याभल्यांना मोक्षाच्या संकल्पना कळत नाहीत; परंतु परात्पर गुरुदेवांनी स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाच्या शिकवणीतून साधकांना त्या लीलया शिकवल्या आहेत.’

– श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ (संग्राहक : एक साधक) (२९.४.२०१८)